Goods Train Accident : बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक मालगाडी रुळावरुन घसरली. या मालगाडीचे पाच डबे नदीत पडले आणि सुमारे 10 डबे उलटले. या अपघातामुळं किउल-जसिदिह विभागातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील तेलवा बाजार हॉल्ट रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. मालगाडी सिमेंट वाहून नेत होती. रेल्वे प्रशासन या विभागातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम करत आहे.
तीन डबे नदीत पडले :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान अनेक डबे रुळावरून घसरले, त्यापैकी तीन नदीत पडले. यामुळं मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही मार्ग विस्कळीत झाले आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे दिलासादायक आहे. (Goods Train Accident)
रेल्वे अधिकारी घटनास्थळी :
अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु झालं आहे. किउल-जसिदिह रेल्वे विभाग हा बिहार आणि झारखंडला जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. हा प्रामुख्यानं हावडा-दिल्ली मुख्य मार्गाचा भाग आहे. या मार्गावरुन दररोज मोठ्या संख्येनं गाड्या जातात. परिणामी, या व्यत्ययामुळं रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे आणि रेल्वे ते लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आसाममध्येही झाला एक अपघात :
यापूर्वी, आसाममध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला होता, ज्यामध्ये ट्रेन क्रमांक 20507 सायरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस हत्तींच्या कळपाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रेनचं इंजिन आणि पाच डबे रुळावरुन घसरले. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, त्यात असलेले कोणतेही प्रवासी जखमी झाले नाहीत. स्थानिकांच्या मते, हत्ती आठ जणांचा कळप होता, ज्यापैकी बहुतेक जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना हत्ती कॉरिडॉर नसलेल्या भागात घडली. लोको पायलटनं कळप पाहून आपत्कालीन ब्रेक लावले, परंतु तरीही ट्रेन त्यांच्यावर आदळली, ज्यामुळं अपघात झाला.












