PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना सतर्क राहण्याचे मोठे आवाहन केले आहे. अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या देशांमधील वाढता तणाव पाहता आणि त्याचे जागतिक परिणाम लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोरोना काळासारखी तयारी आता ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केले आहे.
हेही वाचा – दिल्ली हादरली! विधानसभा, मेट्रो स्टेशनसह सभापतींना बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
लोकसभेत केलेल्या आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धामुळे अन्य देशांप्रमाणे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत. आर्थिक, मानवतावादी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ही आव्हाने आहेत. तसेच ज्या देशांमध्ये युद्ध सुरू आहेत ते देश जगभरातील इतर देशांसोबतच्या आपल्या व्यापारासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. विशेषत: हे देश कच्च तेलाची आणि गॅसची मोठी गरज भागवतात.
भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गॅस, कच्चे तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात मिळतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक अधिकाअधिक आव्हानात्मक होत चालली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अशा तणावाच्या परिस्थितही पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, हे सुनिश्चित करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांना तोडगा काढावा असे आवाहन संपूर्ण जर करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक संकटे उभे राहिली आहेत. त्यामुळे आता कोरोनाकाळात जसा लढा दिला तसाच लढा आता आपल्याला द्यायचा आहे. सध्याचे आव्हान खूप मोठे आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
संकटाच्या काळात देशाबाहेर आणि देशात असलेल्या प्रत्येक भारतीयाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. या युद्धादरम्यान 3.75 लाख भारतीय सुखरूप परतले आहेत. एकट्या इराण देशातून जवळपास 1,000 भारतीय परतले असून त्यामध्ये 700 हून अधिक वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच हे युद्ध सुरू झाल्यापासून बाधित देशांमधील प्रत्येक भारतीयाला मदत पुरवली जात आहे. तर मी पश्चिम आशियातील बहुतेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी फोनवर संपर्क साधला आहे. या सर्वांनी भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.












