Unseasonal Rain | गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी कडक उन्हाचा (Summer) तडाखा तर कधी मुसळधार पाऊस. काही भागांमध्ये तर मागील पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसत आहे. यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा – प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळून ४ जणांचा मृत्यू
कोणत्या पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं दिला रेड अलर्ट?
राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) जाण्याचं नाव काही घेत नाहीये. एकिकडे उन्हाचे चटके बसत असतानाच काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यादरम्यान आता हवामान विभागानं मोठा अंदाज वर्तवला आहे. पाच जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्यानं धाराशिव, लातूर, धुळे, नांदेड आणि परभणी या राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोकणात मात्र उष्ण हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणात उष्ण लाटांचा मोठा इशारा देण्यात आला असून हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे.
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणास नुकसान
मराठवाड्यात आणि तेथील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, आंबे, द्राक्षे यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे 13 तालुक्यांतील 201 गावांमधील 6460 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यासह सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. एकिकडे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून नागरिकांना कामानिमित्तच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे.












