मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल आणि नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांचे हाल झाले असून या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची घोषणा केली.
यावेळी अजित पवार यांनी दिलेली माहिती अशी की,”ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ म्हणजे १० किलो धान्य पुरविण्यात आले आहे. पाण्यामुळे धान्य भिजून खराब झाले असल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने त्यांना शाळा किंवा कार्यालयात तात्पुरती त्यांची सोय करण्यात आली आहे.”
तसेच पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी मिलिट्री, एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित काम केले. अनेक नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि अधिकारी रात्रंदिवस मदतकार्यात गुंतले असून नागरिकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
ज्या ठिकाणी ही पूरस्थिती निर्माण झाली त्या भागांची नुकताच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दौरा करून आढावा घेतला. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला मदतीसाठी पत्र पाठवले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मदतीचे पत्र पाठवले असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
पूरस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीचे उपाय केले जात आहेत, मात्र केंद्र सरकारकडूनही मदत मिळाल्यास या संकटाचा सामना अधिक सक्षमपणे करता येईल, असा विश्वासही अजित पवारांनी दाखविला आहे.