Sunetra Pawar | आज (6 एप्रिल) बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात सुनेत्रा पवारांनी अजित दादांच्या आठवणी जागवत बारामतीकरांसोबत संवाद साधला.
हेही वाचा – नागपूर हादरलं! “वेळ काढून माझ्या अंत्ययात्रेला या…”, भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेनं केली आत्महत्या
नेमकं काय म्हणाल्या सुनेत्रा पवार?
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “मागील 35-36 वर्षांमध्ये अजित दादांना तुम्ही प्रचंड मतांनी निवडून दिलं आहे. दादांनी प्रत्येक वेळी स्वत:चे विक्रम मोडीत काढले आहेत. अजित दादा नेहमी म्हणायचे की, जनतेच्या मताचा बोजा माझ्यावर आहे त्यामुळे मी 24 तास काम करतो. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे बारामतीच्या विकासासाठी आणि दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दु:ख तळघरात कोंडले आहे आणि अत्यंत धिराने आपल्या सर्वांसाठी बाहरे पडले आहे. बारामतीकरांकडे बघूनच मला धीर आला आहे. त्यामुळे आता ही फक्त निवडणूकच नाही तर ही दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची खरी संधी आहे, असे भावनिक आवाहन सुनेत्रा पवारांनी केले.
पुढे त्या म्हणाल्या की, बारामतीचा प्रत्येक नागरिक हा अजित दादांसाठी पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा. हा दादांचा विश्वास होता. दादासांठी बारामती ही आईप्रमाणे होती. म्हणूनच बारामतीच्या मातीतच त्यांचा अखेरचा श्वास विसावला. आज दादा आपल्यात नाहीत हे अजूनही मला मान्य नाही. मात्र, नियतीने माझ्यावर आणि बारामतीकरांवर ही वेळ आणली आहे. दादांचे जाणे हे फक्त माझी, माझ्या कुटुंबाचीच हाणी नाही तर संपूर्ण बारामती, राज्य आणि देशाची मोठी हाणी आहे. तसेच बारामतीत अशा पद्धतीने पोटनिवडणूक होईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.
सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना दिलं मोठं आश्वासन
आज मी विधानसभा पोटनिवडणुकाचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. बारामतीची प्रतिष्ठा मी जराही कमी होऊ देणार नाही, असं वचन मी बारामतीकरांना देते. बारामतीला पवार साहेबांनी विकासाचा दृष्टीकोण दिला आहे. तर अजित दादांनी त्या विकासामध्ये रंग भरत त्यांना जागतिक दर्जाकडे नेले आहे. दादांचं स्वप्न होतं की, त्यांना बारामतीला जागतिक दर्जाचं शहर बनवायचं होतं. पण, त्यांना नियतीने आपल्यातून नेले. तर त्यांच्या विकासाचा विचार पुढे नेण्याचा निर्धार मी केला आहे. मी दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही, त्यांना साक्षिला ठेऊन मी तुम्हाला हे वचन देत आहे. तसेच दादांची जागा कोणीच घेऊन शकत नाही, हे त्रिवार सत्य आहे, असंही सुनेत्रा पवार भावूक होत म्हणाल्या












