Thiruvananthapuram Rajdhani Express Fire: Indian Railwaysच्या तिरुवनंतपुरम–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये रविवारी पहाटे भीतीदायक प्रकार घडला. कोटा रेल्वे विभागातील रतलाम परिसरात धावत्या ट्रेनच्या बी1 एसी डब्यात अचानक धूर दिसू लागल्यानंतर काही क्षणांतच आग भडकली. गार्डने तत्काळ इंजिन चालकाला सतर्क केल्याने गाडी तातडीने थांबवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.
६८ प्रवाशी सुरक्षित
ही घटना अलोट स्टेशनजवळील लुनी रिछा आणि विक्रमगड अलोट स्थानकांच्या दरम्यान पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या ६८ प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ आणि धावाधाव झाली होती. मात्र रेल्वे कर्मचारी, आरपीएफ जवान आणि स्थानिक बचाव पथकांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डबा तात्काळ ट्रेनपासून वेगळा
आग लागल्यानंतर खबरदारी म्हणून संबंधित डबा तात्काळ ट्रेनपासून वेगळा करण्यात आला. तसेच संपूर्ण रेकचा वीजपुरवठा बंद करून पुढील धोका टाळण्यात आला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, तांत्रिक कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.
दिल्ली–मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत
या प्रकारामुळे दिल्ली–मुंबई मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अनेक गाड्या उशिराने धावू लागल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत लवकरच सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे.








