आयुष्यात चांगला शिक्षक आणि चांगलं शिक्षण मिळालं नाही तर काय होतं? दिवटी म्हणजे मशाल असते आणि दिवटा म्हणजे? असे काही दिवटे आहेत ज्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. मराठी भाषेची ही गंमत आहे. शिक्षक मतदारसंघातून आपला लोकप्रतिनिधी कुठलाही वाह्यातपणा न करता शिक्षक म्हणून आपल्या कामात वेगळा ठसा उमटवतो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजच आपण वाचलं कुणीतरी दिल्लीला गेलं होतं, बाबा मला मारलं म्हणून. लाचारी का? तर त्यांना चांगला शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर ह्यांच्या स्थानिक विकासनिधीतून एम. आय. जी. क्लब, वांद्रे पूर्व येथे मुंबईतील विविध शाळांकरिता ‘डिजीटल स्मार्ट बोर्ड’ वितरण शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माझ्या आजोबांचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. माझ्या आजोबांना आणि बाळासाहेबांना सातवीत शाळा सोडावी लागली. कारण फी भरण्याची ऐपतच नव्हती. पण शाळा सोडावी लागली तरी शिक्षण थांबलं नाही. आपल्या मुलांना आई वडील संस्कार देतात म्हणजे काय? तर ते वागणुकीतून देत असतात. असं उद्धव ठाकरे शिक्षक आमदारांच्या कार्यक्रमात म्हणाले.
हेही वाचा – “अजित पवार… अनगरकरांचा नाद करायचा नाही;” बाळराजेंकडून आधी चॅलेंज, नंतर ‘यू टर्न’
चांगल्या लोकांना देशद्रोही ठरवून कसं तुरुंगात टाकलं जातं –
माध्यमं आता बदलत आहेत, आता शाळांमध्ये पाटी आहे की नाही मला माहीत नाही. आपली अक्षरं आईने गिरवून घेतली आहेत. त्यामुळेच मराठीला आपण मातृभाषा म्हणतो. पाटीवर अक्षरं गिरवून मोठी झालेली आपण माणसं. शिक्षक म्हणून मोठं झाल्यानंतर आपल्यासारख्या माणसानेच संगणक शोधला आहे हे विसरता कामा नये. मधे मी सोनम वांगचुक यांचा कार्यक्रम पाहिला. चांगल्या लोकांना देशद्रोही ठरवून कसं तुरुंगात टाकलं जातं याचं सोनम वांगचूक हे उत्तम उदाहरण आहे. त्यांचा उपयोग करुन घ्यायला हवा. नको तो शिक्का मारुन त्यांना आतमध्ये टाकून दिलं आहे. त्यांनी सांगितलं की ते लेह लडाखमध्ये राहतात. तिथे शाळा नव्हती. त्यांनी सांगितलं की, आईने मला मातृभाषेत अनेक गोष्टी शिकवल्या ज्याचा उपयोग मला आत्ता होतो आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
योग्य शिक्षक मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. pic.twitter.com/hWTfdvgA1H
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 20, 2025
मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला
राजकारण म्हटल्यानंतर रेवडी तर सरसकट झाली आहे. दुसरा देईल ती रेवडी आणि आम्ही करु ते उपकार. आम्ही जिंकलो तर फुकट संगणक देऊ. ते फुकट द्याल पण त्यात टाकणार काय? आम्ही टॅब वाटू पण काय करणार? कोरी वही देऊ त्याचं तो काय करेल? पानं फाडून होड्याही करुन पाण्यात सोडू शकतो. आपण जे टॅब दिले होते त्यात आपण अभ्यासक्रम ठेवला होता. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, असंही उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे.
गेली तीन ते चार वर्षे महापालिकेचा बाप कोण? तेच समजत नाही
सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण मूळ विसरुन जातो. टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा करुन घेता आला पाहिजे. कारण तंत्रज्ञान सुधारले आहे. मी २०१४ मध्ये मी एक दप्तर पत्रकार परिषदेन ठेवलं होतं ते पत्रकारांना जड वाटलं. तो अभ्यासक्रम आपण एसडी कार्डमध्येच ठेवला होता. २०१४ पासून पुढे तीन-चार वर्षे ते सुरु होतं. पण आताचं मला माहीत नाही. कारण गेली तीन ते चार वर्षे महापालिकेचा बाप कोण? तेच समजत नाही. महापालिकेत लुटालूट चालली आहे अस आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी मी अमित शाह यांना भेटलो. मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून, मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. राज्यातील छोटे-मोठे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर घेऊन येत नाही, असा प्रतिटोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.












