Ind Vs Zim Match : जायंट किलर झिम्बाब्वेशी उद्या टीम इंडियाची गाठ असणार आहे. मात्र, इंडिया अडचणींवर मात करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. भारतीय संघ सध्या मोठ्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची देखील धकधक वाढल्याचे दिसून येत आहे. कारण आधीच आफ्रिकेविरुद्धच्या पराभावानंतर टीम इंडियाची अवस्था व्हेंटीलेटरवर असल्यासारखी झालीय. त्यामुळे आता उद्याचा सामना ‘करो या मरो’ असाच आहे, आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ आता रोमांचक वळणावर पोहोचला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. सुपर-८ फेरीच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या हानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आले आहे. आता उद्याचेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणारा भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना भारतीय संघासाठी केवळ एक सामना नसून, ती स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे.
हेहा वाचा – भारत टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर? काय आहेत शक्यता वाचा सविस्तर…
दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी धूळ चारल्यामुळे भारताचा नेट रन रेट मायनसमध्ये गेलंय आहे. सुपर-८ च्या गुणतालिकेत भारत सध्या तळाला आहे. जर उद्या झिम्बाब्वेने भारताचा पराभव केला, तर भारतीय संघाचे सेमीफायनल गाठण्याचे स्वप्न भंग पावेल. इतकंच नाही तर केवळ विजय मिळवून भारताचे काम होणार नाही, नेट रन रेट सुधारण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे अत्यंत गरजेचे आहे.
एम. ए. चिदंबरम स्टेडियम हे फिरकीपटूंसाठी नंदनवन
चेन्नईचे एम. ए. चिदंबरम स्टेडियम हे फिरकीपटूंसाठी नंदनवन मानलं जातं. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उद्याच्या सामन्यात दोन किंवा तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतात. कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर मधल्या षटकांत धावा रोखण्याची मोठी जबाबदारी असेल. चेपॉकवर चेंडू संथ येत असल्याने फलंदाजांना मोठे फटके खेळताना संयम ठेवावा लागणार आहे.
भारतीय संघात काही धाडसी बदल पाहायला मिळू शकतात
मागील सामन्यातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघात काही धाडसी बदल पाहायला मिळू शकतात, सलामीवीर अभिषेक शर्माच्या सातत्याच्या अभावामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला सलामीला आणले जाऊ शकते. कारण अभिषेक शर्मानं मागील 5 सामन्यात केवळ 15 धावा केल्या आहेत, त्यातही 3 सामन्यात तो 0 वर बाद झालाय, रिंकू सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्यावर फटकेबाजीची धुरा असेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसोबत जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या षटकांत बळी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील..
सिकंदर रझा हा झिम्बाब्वे टीमचा बाजीगर
झिम्बाब्वेने या वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक खेळी केल्या आहेत. विशेषतः सिकंदर रझा हा त्यांच्या टीमचा बाजीगर असून त्याने याआधी मोठ्या संघांना अडचणीत आणले आहे. भारताला जर सेमीफायनलच्या शर्यतीत राहायचे असेल, तर झिम्बाब्वेच्या ‘बॅटिंग कोलॅप्स’चा फायदा उचलावा लागेल.
ही टीम कोहली, रोहीत शर्माची टीम नाही
भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता दोन गोष्टींची आवश्यकता आहे, झिम्बाब्वे आणि त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकणे…आणि दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करणे…जर असं झालं नाही, तर टीम इंडिया आपसूक वर्ल्डकपमधून बाहेर पडेल…आपली सुरूवात दणक्यात केल्यानंतर या टीमकडून भारतीय क्रिकेट फॅन्सला मोठ्या अपेक्षा होत्या…मात्र ही टीम कोहली, रोहीत शर्माची टीम नाही…जे गेलेला सामना खेचून आणण्यात माहीर होते…या टीमला या संकटातून बाहेर पडणं शिकावं लागणार आहे. त्याशिवाय पुढचा रस्ता कठीण आहे. कोट्यवधी भारतीयांच्या नजरा उद्याच्या सामन्याकडे लागल्या असून, टीम इंडिया पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








