Ajit Pawar | नुकतीच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षातील तीन नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच उळबळ उडाली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याविरोधातील नाराजीवरून या तीन नेत्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, त्यावेळी अजितदादांनी त्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. अजितदादांनी त्यावेळी पक्ष सावरण्याचं काम केलं होतं. पण आता त्यांच्या निधनानंतर कोणतीही माहिती न देता या तिन्ही नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा – “राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी”,अखेर वडेट्टीवारांनी मनातलं बोलूनच टाकलं; म्हणाले, उद्धव ठाकरेंना…
अजितदादा असताना नेमकं काय झालं होतं?
अजित पवार हे हयात असताना त्यांच्या पक्षातील अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी 26 जानेवारीला अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अजितदादांची भेट घेत त्यांच्याकडे आपले राजीनामे सोपवले होते. पण, तेव्हा अजितदादांनी त्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते.
पक्षात आता काय घडलं?
मात्र, आता अजितदादांच्या निधनानंतर पक्षातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आधी राजीनामा दिलेल्या सर्व सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे कोणतंही कारण न विचारता मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आता राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण अजितदादा हयात असताना वेगळी वागणूक मिळत होती आणि आता ते नाहीत तर वेगळी वागणूक मिळत आहे, अशी खंत अनेक नेत्यांमध्ये असल्याचं पहायला मिळत आहे.
कोणत्या नेत्यांनी दिले राजीनामे?
अजित पवारांकडे ज्या नेत्यांनी राजीनामे दिले होते त्यांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये सचिन जाधव (मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष), मनोज व्यवहारे (असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष) आणि सुभाष मालपाणी (उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष) अशा तिन्ही नेत्यांनी राजीनामे दिले होते. तर आता अचानक कोणतंही कारण न विचारता या तिन्ही नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ज्या ज्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, त्या सर्वांमध्ये सुनील तटकरेंविरोधात नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.












