Bhujbal Rajya Sabha Minister Nephew : पमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षात कोणा एकाचे नेतृत्त्व नसल्याचे दिसून येत आहे. आणि जे नेतृत्त्व करतात त्यांचे इतर नेते ऐकतातच असे नाही. अचानक घडलेल्या काही घडामोडींमुळे सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आणि त्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्या. त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून कोणाची वर्णी लावायची यावरून मोठा खल सुरू आहे.
दरम्यान, राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर आहे. पण त्यांच्या एका अटीमुळे पेच वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरात तीन पदं असल्याचा उल्लेख भुजबळांनी यापूर्वी केला होता तर आता पुतण्याा समीर भुजबळ याला मंत्रीपद द्या, अशी मागणी भुजबळांनी केल्याचे समजते. दरम्यान, एकाच घरात दोन पदी घेण्याची ही खेळी यशस्वी होते की, राष्ट्रवादी काँग्रेस नवीन चेहरा शोधते हे आज संध्याकाळपर्यंत समोर येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिक्त जागेवर कुणाला पाठवायचं यावरून कालपासून मोठा खल सुरू आहे. राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांच्या घरी अगोदर बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात संधी देण्याची मागणी भुजबळांनी केल्याचे समजते. त्यावर दिल्लीत बोलून मग निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून दिल्याची माहिती समोर येत आहे. 8 जून रोजी अर्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत अथवा उद्या सकाळपर्यंत राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा होणार असल्याचे समजते.
समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घेण्याची अट
भुजबळांनी पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली आहे. आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, नंतर राज्यसभेचा अर्ज भरणार अशी अट भुजबळांनी घातली आहे. त्याला आता 15 तास उलटून गेले आहेत. पण त्यांच्या उमेदवारीवर अद्याप निर्णय झालेला नाही. भाजप पक्ष श्रेष्ठींनी याविषयी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार असल्याचे समजते. तर आज सकाळी नवनीत राणा यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली. राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
येत्या 24 तासात याविषयीचे चित्र स्पष्ट होणार
गुरुवारी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. पण राष्ट्रवादीची विचारसरणीत काम करण्यावरून ताळमेळ बसणार नाही असा त्यांचा सूर होता. पण आता समीकरणं बदलत असल्याने त्यांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते. राज्यसभेच्या खासदारकीसाठी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ही जागा भाजपच्या खात्यात येण्यासाठी राणा दाम्पत्य प्रयत्न करत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 24 तासात याविषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.







