Congress On Parth Pawar | राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. तर अजित पवारांचा अपघात आहे की घातपात? अशी शंका अजूनही व्यक्त केली जात आहे. याबाबत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी देखील शंका निर्माण केली आहे. अशातच आता राज्यात सर्वांचं लक्ष लागलं आहे ते बारामती पोटनिवडणुकीकडे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसने (Congress) आपला उमेदवार उभा केला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीची अपेक्षा होती. मात्र, आता काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचा हा डाऊनफॉल असल्याचा दावा पार्थ पवार यांनी केला आहे. तर पार्थ पवार यांनी केलेल्या या दाव्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसने खोचक टीका केली आहे.
हेही वाचा – अशोक खरात महिलांना जाळ्यात कसं ओढायचा? स्वत:च केला मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यांच्या….”
काँग्रेसने पार्थ पवारांवर नेमकी काय केली टीका?
काँग्रेस पक्षाने आज ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून काँग्रेसने पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील”, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे.
पुढे पक्षाने म्हटले आहे की, “या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?”, अशी खोचक टीका काँग्रेसने पार्थ पवारांवर केली आहे.
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत…
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 6, 2026
दरम्यान, काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीच्या मुहूर्तावरच पार्थ पवारांवर जहरी टीका केली आहे. तर काँग्रेसच्या या टीकेवर पार्थ पवार नेमकी काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












