Salman Khan NEET Protest : उशिरा का होईना बॉलिबॉडला आलं भान आणि अखेर जागा झाला भाईजान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीटवरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला आता बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याने जाहीर पाठिंबा दर्शवलाय, आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या आणि हिंसेच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशातील सर्वात मोठ्या कलाकारांच्या शांततेवर सोशल मीडियावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना, सलमान खानने अखेर आपले मौन सोडले असून विद्यार्थ्यांच्या या लढ्याला लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्याचा योग्य मार्ग म्हटले आहे. विशेष म्हणजे, सलमान खानच्या या भूमिकेपूर्वीच मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी या आंदोलनात उडी घेतली असून प्रकाश राज, शबाना आझमी, विजय वर्मा, जान्हवी कपूर, रिचा चड्डा, हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा, अतुल कुलकर्णी, अनुपम खेर, , आदिती राव हैदरी, प्रिती झिंटा, स्वरा भास्कर आणि कुणाल कामरा यांसारख्या अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यामुळे आता या विद्यार्थी आंदोलनाला केवळ राजकीय पातळीवरच नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातूनही मोठे वजन प्राप्त झाले असून केंद्र सरकारवरील दबाव प्रचंड वाढला आहे. सलमान आणि इतर कलाकारांनी या आंदोलनावर नेमकं काय म्हटलंय?
सलमान खानचा NEET आंदोलनाला पाठिंबा; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल :
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीच्या गंभीर समस्येवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाने नुकतेच हिंसक वळण घेतले जेव्हा विद्यार्थ्यांनी ‘चलो संसद’ अंतर्गत संसद भवनाकडे शांततापूर्ण मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत आंदोलक विद्यार्थ्यांना अडवले आणि जमावाला पांगवण्यासाठी अमानुष लाठीमार केला अन् अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या. या लाठीचार्जामध्ये अनेक तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी झाले, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. या व्हिडिओंच्या आणि विद्यार्थ्यांच्या जखमांच्या फोटोंनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले, ज्यावर आता सलमान खानसह अनेक मोठ्या कलाकारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
हेही वाचा : तरुणांवर लाठीचार्ज मोदींविरोधात वातावरण! 2029 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार का?
Salman Khan NEET Protest : सलमान खानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. त्याने आपल्या शालेय जीवनातील एक जुना फोटो शेअर करत लिहिले की, हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू झाले होते, परंतु त्याला अशा प्रकारे हिंसक वळण लागलेले पाहून मनाला अत्यंत वेदना होत आहेत. या पोलीस कारवाईत ज्या विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे आणि ज्यांच्या कुटुंबांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, त्यांच्याप्रती माझ्या मनात पूर्ण सहानुभूती आणि संवेदना आहेत. पेपर लीक होणे हा आपल्या अत्यंत गंभीर विषय आहे, आणि देशातील तरुण पिढी एका चांगल्या, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहे, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाचा अवलंब केला असून, त्यांचे धैर्य, जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेली प्रामाणिक भावना कौतुकास पात्र आहे, असा विश्वास सलमानने व्यक्त केला.
आपल्या या विस्तृत निवेदनात सलमान खानने एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे, ते म्हणजे या विद्यार्थी आंदोलनाचे होणारे राजकीय हायजॅकिंग. सलमानने स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, हा लढा केवळ विद्यार्थी आणि देशाची शिक्षण व्यवस्था यांच्यातील आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा बाहेरील शक्तीने या आंदोलनाचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करू नये आणि याचे पूर्ण श्रेय केवळ आणि केवळ आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांनाच मिळाले पाहिजे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या या रास्त मागण्यांचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल आणि देशातील शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत, पारदर्शक करण्यासाठी सकारात्मक पावले उचलेल, असा दृढ विश्वासही त्याने व्यक्त केला. हा लढा जर यशस्वी झाला तर ती विद्यार्थ्यांसह संपूर्ण देशासाठी एक ‘विन-विन’ म्हणजेच सर्वांच्याच फायद्याची परिस्थिती असेल, असेही तो म्हणाला. आपल्या संदेशाच्या शेवटी सलमान खानने एक नवी संकल्पना मांडली की, शिक्षण ही केवळ एक गरज न राहता आपल्या देशातील पुढची सर्वात मोठी ‘ट्रेंड’ आणि ‘फॅशन’ बनली पाहिजे. शिक्षणाचा दर्जा दरवर्षी इतका वाढला पाहिजे की, जगभरातील परदेशी विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येतील आणि भारत जागतिक स्तरावर एक मजबूत ‘एज्युकेशनल हब’ म्हणून नावारूपाला येईल.
Salman Khan NEET Protest : जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बॉलिवूडचा पाठिंबा
सलमान खानच्या या पोस्टनंतर मनोरंजन विश्वातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे लाखो चाहत्यांनी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सलमानच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, तरुणांच्या हक्कासाठी ‘भाईजान’ मैदानात उतरल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे सलमानने या आंदोलनाला पाठिंबा देताच त्याचा एक अत्यंत जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या जुन्या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचे वडील सलीम खान ( Salman Khan ) आणि भाऊ अरबाज आणि सोहेल खान यांच्यासोबत कपिल शर्मा शोमध्ये बसलेला दिसत आहे. तिथे सलीम खान यांनी मिश्कीलपणे एक किस्सा सांगितला होता की, सलमानच्या शालेय जीवनात त्यांच्या घरी गणेश नावाची एक व्यक्ती यायची, जिला घरात खूप आदर दिला जायचा, कारण ती व्यक्ती परीक्षांच्या वेळी लीक झालेले पेपर्स सलमान आणि त्याच्या भावांसाठी आणून द्यायची. सलमाननेही त्या शोमध्ये हसत हसत ही गोष्ट मान्य केली होती की त्याने लीक पेपर्सच्या मदतीने काही परीक्षा पास केल्या होत्या. हा व्हिडिओ समोर आणत काही नेटकऱ्यांनी सलमान खानला ढोंगी ठरवले असून, जो स्वतः लीक पेपर्सवर शिकला, तो आज पेपरफुटीवर ज्ञान देत असल्याची टीका केली आहे. तर दुसरीकडे, सलमानच्या समर्थकांनी आणि अनेक विद्यार्थ्यांनी असे म्हटले आहे की, तो एक बालपणीचा हलका-फुलका कौटुंबिक किस्सा होता, ज्याची तुलना आजच्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील नीट सारख्या स्पर्धा परीक्षेच्या महाघोटाळ्याशी करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
NEET Paper Leak : सलमान खानच्या आधीच या आंदोलनाला बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे दिल्लीतील या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि अष्टपैलू अभिनेते प्रकाश राज यांनी तर थेट दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. प्रकाश राज यांनी केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणावर कडाडून टीका करताना म्हटले की, प्रश्न विचारणाऱ्या तरुणांचा आवाज लाठ्यांच्या जोरावर दाबणे हा लोकशाहीचा खून आहे. शबाना आझमी यांनीही देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत, लाखो विद्यार्थ्यांच्या रात्रीचा दिवस करून केलेल्या मेहनतीचा असा लिलाव होऊ देणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. यासोबतच तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कलाकार जसे की विजय वर्मा, जान्हवी कपूर आणि हुमा कुरेशी यांनी सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. जान्हवी कपूरने लिहिले की, जे विद्यार्थी देशाचे भविष्य घडवणार आहेत, त्यांना रस्त्यावर रक्त सांडावे लागत आहे, हे पाहून हृदय तुटतं. विजय वर्मानेही शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे पोलिसांची अरेरावी कारणीभूत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणावर देशभरात संताप
या आंदोलनात सुरुवातीपासूनच आक्रमकपणे आपली मते मांडणाऱ्या अभिनेत्री रिचा चड्डा आणि स्वरा भास्कर यांनी सरकारला धारेवर धरले आहे. स्वरा भास्कर, जी नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर बोलते, तिने म्हटले की, देशातील शिक्षण मंत्रालयाने आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी आपली विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे. पेपरफुटीमुळे देशातील तरुण नैराश्याच्या गर्तेत ढकलला जात आहे आणि जेव्हा तो न्यायाची मागणी करतो, तेव्हा त्याला बक्षीस म्हणून पोलिसांचा लाठीमार मिळतो, हे अत्यंत लज्जास्पद आहे. रिचा चड्डानेही विद्यार्थ्यांच्या समर्थनात पोस्ट करत म्हटले की, देशातील तरुणांचा संताप आता अनावर झाला असून सरकार त्यांच्या आवाजाला दडपू शकत नाही. प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने नेहमीच्या उपरोधिक शैलीत सरकारवर निशाणा साधत, विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षांचे पेपर्स जास्त सुरक्षित ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सिता के पती का नाम लेके नीता के पती का काम कर रहै है, हे तर कामराचं वक्तव्य म्हणजे वादाच्या शिखरस्थानी आहे…
प्रकाश राज, शबाना आझमी, अनुपम खेर यांच्यासह कलाकारांची भूमिका
दुसरीकडे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही या विषयावर एक विशेष व्हिडिओ संदेश जारी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशातील सर्वात प्रामाणिक आणि निष्पक्ष आंदोलन म्हटले आहे. अनुपम खेर म्हणाले की, जेव्हा विद्यार्थी फक्त आपल्या हक्काची आणि चांगल्या भविष्याची मागणी करत असतात, तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज होणे अत्यंत दुर्दैवी आहे. मी स्वतः कधीकाळी विद्यार्थी चळवळीचा भाग राहिलो असल्यामुळे तरुणांचा राग आणि त्यांच्या मनातील अस्वस्थता मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. परंतु, त्यांनीही सलमान खानप्रमाणेच विद्यार्थ्यांना एक मोठा भाऊ म्हणून मोलाचा सल्ला दिला आहे. खेर यांच्या मते, विद्यार्थ्यांनी बाहेरील राजकीय पक्षांच्या अजेंड्यापासून अत्यंत सावध राहिले पाहिजे; कारण जेव्हा राजकीय नेते आंदोलनात सामील होतात, तेव्हा ते स्वतःच्या स्वार्थासाठी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक आवाजाचा वापर करू लागतात, ज्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडतो आणि आंदोलनाच्या पवित्रतेला धक्का पोहोचतो.
Salman Khan NEET Protest : सोशल मीडियावर #NEETProtest ट्रेंड
या आंदोलनाला सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, प्रिती झिंटा आणि अतुल कुलकर्णी यांसारख्या अन्य मुख्य प्रवाहातील कलाकारांनीही डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने बळ दिले आहे. अतुल कुलकर्णी यांनी शिक्षण व्यवस्थेतील या गंभीर दोषांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, तर प्रिती झिंटा आणि आदिती राव हैदरी यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीसाठी चिंता व्यक्त करत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अगदी ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतनेही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत, “माझ्या देशातील मुले रडत आहेत, त्यांच्यावर लाठ्या मारू नका, त्यांना अभ्यास करू द्या,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सर्व कलाकारांच्या एकत्र येण्यामुळे सोशल मीडियावर #StudentsProtest, #NEETPaperLeak आणि #CJPJantarMantar हे हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत आहेत.
NEET Protest : राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, विद्यार्थ्यांचा आवाज लाठीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न हुकूमशाही प्रवृत् आहे, काँग्रेस पक्ष देशातील विद्यार्थ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. वाढत्या जनक्षोभाच्या आणि जंतर-मंतरवरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्लीतील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त २० कंपन्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे परिस्थितीची संवेदनशीलता स्पष्ट होते. पेपरफुटीच्या या राष्ट्रीय संकटामुळे आणि त्यावर झालेल्या पोलीस कारवाईमुळे देशातील विद्यार्थी आणि तरुण वर्ग प्रचंड संतप्त झाला आहे. सुरुवातीला मोठ्या स्टार्सच्या मौनामुळे निर्माण झालेली नाराजी आता सलमान खान, अनुपम खेर आणि अन्य १४ हून अधिक प्रमुख कलाकारांच्या स्पष्ट भूमिकेमुळे दूर होताना दिसत आहे. कलाकारांच्या या मोठ्या पाठिंब्यामुळे आता हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचा राहिलेला नसून, तो देशाच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्बांधणीचा आणि लाखो तरुणांच्या भविष्याचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे.









