Sant Gadgebaba Jayanti 2026: सोलापूर विद्यापीठात संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता आणि स्वच्छतेचा संदेश दिला गेला. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन, वृक्षारोपण आणि निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.
सोलापूर:
संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या स्वच्छतेच्या विचारांचे स्मरण करून तो जीवनात अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. स्वच्छतेमुळेच समाजात आरोग्यदायी व सकारात्मक वातावरण निर्माण होते, त्यामुळे कुटुंब, परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’अंतर्गत गुरुवारी संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. महानवर हे बोलत होते. यानंतर विद्यापीठाच्या अतिथीगृहासमोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
आणखी वाचा: महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १३५ वा जयंती महोत्सव; भव्यदिव्य स्वरूपात होणार साजरा!
या कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, समन्वयक डॉ. गौतम कांबळे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
समता सप्ताहाच्या निमित्ताने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : जीवन व कार्य’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले : जीवन व कार्य’ या विषयांवर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांमधून सामाजिक समतेचे मूल्य, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आल्याचे उपस्थितांनी नमूद केले.










