Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Elections) नऊ जागा मे महिन्यात रिक्त होणार आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुका जाहीर केल्या आहेत. तर या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू होणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यासह नऊ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या जागा रिक्त होत आहेत.
हेही वाचा – इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्तानचे प्रयत्न; तेहराननंतर थेट अमेरिकेच्या दिशेने हालचाल
कोणत्या नऊ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपणार?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नऊ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे त्यामुळे या निवडणुका घेणे आवश्यक झाले आहे. ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे यामध्ये उद्धव ठाकरे, संजय किशनराव केणेकर, नीलम दिवाकर, संदीप दिवाकर जोशी, दादाराव यादवराव केचे, अमोल रामकृष्ण मिटकरी, रणजित सिंग विजय सिंग मोहिते-पाटील, राजेश धोंडीराम राठोड आणि शशिकांत जयवंतराव शिंदे यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 एप्रिल रोजी सुरू होईल आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल आहे. तसेच उमेदवार 4 मे 2026 पर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. तर या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी असणार आहे. तसेच मतमोजणीसुद्धा 12 मे रोजीच होणार असून मतमोजणी सायंकाळी 5 वाजल्यानंतर सुरू होईल.
उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाणार का?
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत, ज्यामध्ये शिवसेनेचे (उबाठा) 21 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 आमदार आणि राष्ट्रवादी-समाजवादी पक्षाचे 10 आमदार आहेत. तसचे इतरांकडे 12 जागा आहेत. दुसरीकडे, भाजपचे 132 आमदार, एकनाथ शिंदे गटाचे 56 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत. विरोधी पक्षांकडे आमदारांची संख्या कमी असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर एकही जागा जिंकण्याच्या स्थितीत नाहीत. अशा परिस्थितीत, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेत जाऊ शकतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विरोधी पक्ष केवळ एकच जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे.












