नवी दिल्ली Raghav Chadha : आम आदमी पक्षात मोठं बंड दिसून आले आहे. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह तीन खासदारांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही खासदारांनी एकत्र भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राघव चड्ढा यांच्यासोबत आम आदमी पक्ष सोडणाऱ्यांमध्ये अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांचा समावेश आहे. या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा : “दीदी जात आहे, भाजप येत आहे…”, बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजपची
राघव चड्ढा यांच्यासह तीन खासदारांनी ‘आप’मधून बाहेर पडण्याची घोषणा :
राघव चड्ढा यांच्यासह तीन खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यांना पक्ष सोडण्यास का भाग पडलं, याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. संदीप पाठक म्हणाले, “मी कधीही स्वतःला पुढं केलं नाही. मी नेहमीच आम आदमी पक्षाला प्रथम स्थान दिलं आहे. मी अरविंद केजरीवाल यांना प्रथम स्थान दिलं आहे. देशभरात पक्षाचे लाखो कार्यकर्ते आहेत जे आम आदमी पक्षाला प्रथम स्थान देतात.”
आणखी जास्त खासदार आमच्यासोबत :
संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार राघव चड्ढा म्हणाले, “आम्ही, राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानाच्या तरतुदींचा वापर करुन भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.” राघव चड्ढा म्हणाले की, दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्यासोबत आहेत. हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रमजीत सिंग साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील आमच्यासोबत आहेत.
काय म्हणाले राघव चड्डा :
राघव चड्ढा म्हणाले, “ज्या आम आदमी पार्टीला मी माझं रक्त आणि घाम गाळून वाढवलं आणि माझ्या तारुण्याची 15 वर्षे समर्पित केली, ती पार्टी आपली तत्त्वे, मूल्ये आणि मूळ मूल्यांपासून भरकटली आहे. आता हा पक्ष राष्ट्रीय हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत आहे. गेल्या काही वर्षांपासून मला असे वाटत होते की, मी चुकीच्या पक्षात योग्य व्यक्ती आहे. त्यामुळं, आज मी जाहीर करतो की, मी आम आदमी पार्टी सोडून लोकांच्या अधिक जवळ येत आहे.”








