Mumbai Pune Missing Link: मुंबई- पुणेला जाण्यासाठी ४ ते ५ तास लागतो. मात्र आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उदघाटन १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंगळाने (MSRDC) विकसित केलेला हा प्रकल्प मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता या वेबसाईटवर पाहता येणार
उदघाटन आणि खर्च
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचे उदाहरण मानला जात आहे.
प्रवास अधिक जलद आणि सुलभ
नव्या मार्गामुळे मुंबई- पुणे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी घटणार आहे. खंडाळा घाटातील अवघड आणि वळणावळणाचा मार्ग टाळता येणार असल्याने वाहतूक अधिक सुरळीत होईल. या मार्गावर सुमारे ७० % वाहतूक वळवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
या प्रकल्पात दोन मोठे बोगदे तयार करण्यात आले आहेत. यातील एक बोगदा ८.९२ किमी लांबीचा असून आशियातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. तर दुसरा १.७५ किमी लांबीचा आहे. हे बोगदा आठ लेन वाहतुकीसाठी सक्षम असून आधुनिक सुरक्षा व्यवस्था, वेंटिलेशन आणि प्रकाशयोजना यांसह सुसज्ज आहेत.
महत्त्वाचे पूल आणि मार्ग
टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल बांधण्यात आला आहे, ज्याचे खांब 184 मीटर उंच आहेत. तसेच 850 मीटर लांबीचा व्हायाडक्टही तयार करण्यात आला आहे. हा मार्ग खोपोली ते कुसगाव (लोणावळा) यांना जोडतो आणि लोणावळा तलावाखालून जातो.
यामुळे लोणावळा, लोणावळा परिसरातील किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.







