false implication minor dispute case : भोर तालुक्यातील नसरापुरात 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला संपवणाऱ्या आरोपीला अटक करून जेव्हा कोर्टासमोर हजर करण्यात आलं तेव्हा या नराधम आरोपीनं स्वतःच्या बचावासाठी वेगळाच बनाव रचला. “काही तक्रार आहे का?” असं कोर्टानं विचारताच,’किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात गोवण्यात आलं आहे,” असं अत्यंत निर्लज्जपणे या थेरड्यानं त्यावर उत्तर दिलं. असं उत्तर देऊन त्यानं स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र, पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा हा बनाव फुसका ठरला. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. अखेर पोलिसांनी केलेल्या युक्तिवादानंतर कोर्टानं त्याची 7 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.
हेही वाचा – “त्या थेरड्याचा ‘चौरंगा’ करा”; तरच हे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं राज्य
गोठ्यात नेण्यापूर्वी चिमुकलीला काय खायला दिलं, पोलिसांची माहिती समोर
याप्रकरणी तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडत कोर्टाचे लक्ष वेधले. आरोपीनं चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्यानं, त्या अनुषंगानं त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची असल्याचं त्यांनी कोर्टासमोर मांडलं. आरोपीनं ज्या शस्त्रानं चिमुकलीची हत्या केली, ते शस्त्र जप्त करायचं असून साक्षीदारांचे जबाबही नोंदवायचे आहेत. शिवाय या गुन्ह्यात त्याला इतर कुणी मदत केलीये का याचीही चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. आता आणखी एक महत्त्वाची माहिती… या भीमराव कांबळे नामक आरोपीनं चिमुकलीला कोणत्या गोष्टीचं आमिष दाखवून गोठ्यात नेलं आणि गोठ्यात नेण्यापूर्वी तिला काय खायला दिलं याची पोलिसांनी दिलेली माहिती तर धक्कादायक आहे.
चिमुकलीला गाठी-शेव खायला दिली, अन् नंतर गाईचं वासरू दाखवतो म्हणून गोठ्यात नेलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं आधी चिमुकलीला गाठी-शेव खायला दिली आणि त्यानंतर “चल तुला गोठ्यात नुकतंच जन्माला आलेलं गाईचं वासरू दाखवतो” असं सांगून तो तिला गोठ्यात घेऊन गेला आणि तिथंच तिच्यावर अमानुष अत्याचार करून तिला संपवलं. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानं तपासणी केली असून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून पीडितेच्या पालकांनी तसेच तिच्या नातेवाईकांनी काल शनिवारी नवले पुलाजवळ पुणे-बंगळुरू महामार्ग सुमारे चार तास रोखून धरला होता.
त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्यानं आमच्या घरी भेटायला येऊ नये
अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवल्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर विविध राजकीय मंडळी सांत्वन करण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला येत असल्याचं समजताच पीडितेच्या वडिलांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडलीये. “नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी अस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्यानं आमच्या घरी भेटायला येऊ नये, अशी विनंती पिडीत चिमुकलीच्या वडिलांनी केली केलीय.












