Sharad Pawar NCP Congress Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चांनी राजकीय वर्तुळात मोठं उधाण आलंय. गेल्या त्यामुळे सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत या विषयावर जोरदार खलबते सुरू असून, काँग्रेस हायकमांडने या विलीनीकरणासाठी शरद पवारांना एक मोठा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. या संभाव्य निर्णयामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून शरद पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतचा औपचारिक प्रस्ताव देण्यात आला आहे. भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावाला आणि सत्तेला आव्हान देण्यासाठी सर्व समविचारी शक्तींनी एकाच झेंड्याखाली येणे आवश्यक असल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी विलीनीकरणाच्या विषयावर सूचक विधान केले. ते म्हणाले की, “देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच दिला होता आणि आता त्यावर गांभीर्याने चर्चा सुरू आहे.” त्यामुळे या चर्चेला आता आणखीन महत्त्व प्राप्त झालं आहे.
संजय राऊत यांनीही या चर्चेला अधिक जोर दिला
शिवसेना यूबीटी नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या चर्चेला अधिक जोर दिला आहे. राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “जे पक्ष पूर्वी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडले होते, त्यांनी आता पुन्हा मूळ पक्षात परतले पाहिजे. शरद पवार यांनी याकामी पुढाकार घेतला तर भाजपविरोधात एक भक्कम आणि अभेद्य फळी उभी राहू शकते.” राऊत यांच्या या विधानामुळे केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या सर्व नेत्यांनी आता ईगो बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले आहे.
योग्य वेळी योग्य राजकीय निर्णय घेतले जातील – रोहित पवार
या सर्व घडामोडींवर शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांनी मात्र सध्या सावध पवित्रा घेतला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्या सल्ल्याचा आदर करत “संजय राऊत नेहमी देशहिताचा विचार करून आपली मते मांडत असतात, त्यांच्या या सल्ल्याची आम्ही निश्चित नोंद घेऊ,” असे म्हटले आहे. मात्र, त्यांनी विलीनीकरणाचा निर्णय अंतिम झाल्याचे स्पष्ट केलेले नाही. दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही भाजपविरोधी लढा मजबूत करण्यासाठी योग्य वेळी योग्य राजकीय निर्णय घेतले जातील, असे संकेत दिले आहेत. पक्षातील अंतर्गत बैठकांमध्ये विलीनीकरणाबाबत सदस्यांची मते जाणून घेतली जात असल्याचे समजते.
भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोठं आव्हान मिळणार
दुसऱ्या बाजूला, हे विलीनीकरण भाजपच्या ‘फोडाफोडी’च्या राजकारणाला चोख प्रत्युत्तर ठरेल, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. भाजपने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांना कमकुवत करून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास एक राष्ट्रीय स्तरावरील प्रबळ पर्याय उभा राहील. यामुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही भाजपच्या विरोधात एक नवा ‘नॅरेटिव्ह’ तयार होईल. एका मोठ्या आणि जुन्या पक्षाची संघटनात्मक शक्ती आणि शरद पवारांचा दांडगा अनुभव एकत्र आल्यास, भाजपला आगामी निवडणुकांमध्ये आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागतील, जे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.












