Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेतील हजारो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय कारण आहे आणि कोणत्या महिलांवर याचा परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया सविस्तर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यासह राज्यातील मोठ्या संख्येने महिलांनी आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांचा लाभ धोक्यात आला आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत अनेक अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने संबंधित महिलांना अपात्र घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ई- केवायसी न केल्यास फटका
योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अचूक राहावी यासाठी शासनाने गेल्या काही महिन्यांपासून ईकेवायसी मोहीम राबवली होती. या काळात लाभार्थीना आधार क्रमांक, बँक खाते आणि इतर आवश्यक कागपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र अनेक महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यासाठी दिलेली अंतिम मुदत असून सध्या मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
चुकीची माहिती देणाऱ्यांवर प्रशासनाची नजर
पडताळणीदरम्यान काही लाभार्थ्यांनी पात्रता निकषांशी विसंगत माहिती सादर केल्याचे आढळून आले. शासनाने विविध विभागांच्या नोंदीची तुलना करून अर्जांची तपासणी केली. यात उत्पन्न, करभरणा आणि वाहन नोंदणीसंदर्भातील माहितीचा आधार घेण्यात आला. नियमांनुसार अपात्र ठरणाऱ्या अर्जांची छाननी करून त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.
पात्र महिलांसाठी दिलासा
दुसरीकडे, प्रत्यक्षात पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या अर्जांचा पुन्हा आढावा घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. अशा प्रकरणांमध्ये कागदपत्रांची फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पुढील प्रक्रिया
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लाभार्थ्यांनी दिलेली माहिती अचूक असणे आणि सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या अर्जदारांना योजनेतून वगळले जाऊ शकते, तर पात्र महिलांना योग्य तपासणीनंतर लाभ देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.












