Maharaj controversial statement : नसरापुरात चिमुकलीविषयी घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेबाबत जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या त्या नराधम आरोपी थेरड्याला कोणती शिक्षा व्हायला हवी? असं जर कुणी विचारलंच तर प्रत्येक जण त्याला कसं मारलं पाहिजे हे स्वतःहून सांगायला पुढं येईल… त्या थेरड्याला भर चौकात फाशी द्या, त्याला दगडानं ठेचून मारा, त्याला बुलडोझरखाली घालून चिरडून टाका, त्याला उकळत्या तेलात टाका, त्याच्या हातापायाला भला मोठा दगड बांधून त्याला कड्यावरून ढकलून द्या, त्याला गोळ्या घालून त्याचा एन्काऊंटर करा… शिक्षेचे असे किती तरी प्रकार जनतेतून पुढं येतील. अशा नराधमांना संपवण्यासाठी आणखी एक शिक्षा करता येईल जी असं दुष्कृत्य करणाऱ्या एका नराधमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती… आणि ती म्हणजे चौरंगा! आता देखील हिच मागणी जोर धरू लागली आहे. त्या थेरड्याचा चौरंगाच केला पाहिजे तर तुम्हा आम्हाला ही छत्रपतींच्या विचारांचे राज्य आहे, असं म्हणता येईल.
रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम
नसरापुरातील ही घटना पाहून 380 वर्षांपूर्वी म्हणजे 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेकाळी याच पुणे जिल्ह्यात दिलेल्या त्या ऐतिहासिक न्यायनिवाड्याची आज आठवण होतेय. आजच्या घडीला पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रांझे गावच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केल्याची खबर मिळताच छत्रपती शिवरायांनी त्या रांझ्याच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करण्यास सांगून त्याचा चौरंगा केला होता. या स्वराज्यात हे असं दुष्कर्म कदापि खपवून घेतलं जाणार नाही, असा संदेश महाराजांनी त्या न्यायनिवाड्यातून दिला होता आणि असं कृत्य करण्यास धजावू पाहणाऱ्या इतर नराधमांवर जरब बसवला होता.
बदलापूर प्रमाणं त्याचाही एन्काऊंटर तर करता येईल ना?
भारतात लोकशाही आहे. इथं कायद्याचं राज्य आहे. हे सगळं ठीक आहे. पण आजच्या काळात वासनेनं बरबटलेल्या या अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी या कायद्यांची कडक अंमलबजावणी होणं देखील तितकंच गरजेचं आहे. मान्य आहे की, त्याचा भर चौकात चौरंगा करता येणार नाही पण त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा तर देता येईल ना? बदलापूर प्रमाणं त्याचाही एन्काऊंटर तर करता येईल ना? अहो, यापूर्वी एकदा नव्हे, तर दोनदा विनयभंग करून मोठ्यात मोठी शिक्षा नं झाल्यानं जामीनावर सुटलेल्या आणि तरीही वासनेची भूक न शमलेल्या या नराधम थेरड्याला शिक्षा करताना पुढचा मागचा कसला विचार करायचा? त्याला शिक्षा करण्यासाठी एवढा वेळ वाया का घालवायचा? त्याला ‘सरकारी पाहुणा’ बनवून फुकट का पोसायचा? आधीच्या गुन्ह्यांत जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली असती, तर माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार करण्यास तो धजावला नसता आणि ती चिमुकली आज जिवंत असती, खेळताना अन् बागडताना दिसली असती.
आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या – पिडित कुटुंबाची मागणी
विनयभंग, अत्याचार करूनही हे नराधम सहीसलामत सुटून पुन्हा पुन्हा अशी दुष्कृत्य करत असतील तर कायद्याची जराशीही भीती न बाळगणाऱ्या या नराधमांना आणखी कोणत्या कायद्याची भीती घालत बसणार? आरोपीला आताच्या आता फाशी द्या नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या, असं म्हणणाऱ्या त्या चिमुकलीच्या आई-बापाचं काय चुकलं हो? अहो, ज्या वयात तिनं आई-वडलांच्या अंगाखांद्यावर खेळायचं त्याच वयात तिला मुखाग्नी द्यावा लागणं यापेक्षा एखाद्या आई- बापाच्या वाट्याला आलेलं सर्वात मोठं दुःख ते काय? आपल्या मुलीचा गोड, हसरा चेहरा पाहून तिचा बालहट्ट पुरवण्याची स्वप्नं पाहणाऱ्या त्या आई-बापानं आज कुणाच्या तोंडाकडं पाहायचं? हे सारं विदारक चित्र पाहून आज प्रत्येकाचं मन सुन्न झालंय. तोंडातून शब्द फुटेनासे झालेत.
त्या थेरड्याला काय शिक्षा होतेय आणि त्या चिमुकलीला न्याय कधी मिळतोय
नको ती घटना घडून गेली, मोर्चे काढून झाले, चिमुकलीही तिच्या अंत्यसंस्कारानंतर अनंतात विलीन झाली आता मागं उरल्या त्या तिच्या आठवणी आणि आई-वडलांच्या वाट्याला तिच्याविना आलेलं भकास, उदास आणि दु:खदायक जीवन! आता सारा महाराष्ट्र वाट पाहातोय, त्या थेरड्याला काय शिक्षा होतेय आणि त्या चिमुकलीला न्याय कधी मिळतोय याची… सत्ताधाऱ्यांनो, तुमचं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे असा ढोल बडवता ना? मग जे काही करायचंय ते लवकरात लवकर करा… फाशी द्या, एन्काऊंटर करा काहीही करा आणि ते ही जमत नसेल, तर छत्रपती शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाबाबत दिलेल्या न्यायनिवाड्याचं स्मरण करून या नसरापूर प्रकरणातील नराधम थेरड्याचा चौरंगा कराच… तुम्हाला काय वाटतं…












