Nanded encroachment drive violence : नांदेड शहरात खडकपुरा परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले. शहराला बकालपणातून मुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम तीव्र केली आहे. मात्र, खडकपुरा ते वाघी रोड दरम्यान सुरू असलेल्या कारवाईवेळी स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट महापालिकेच्या पथकावर हल्ला चढवला. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, नांदेड वाघाला शहर महानगरपालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढली जात आहेत. या मोहिमेअंतर्गत आनंद नगर, भाग्यनगर रोड आणि मोर चौक ते छत्रपती चौक या भागांत यशस्वीरीत्या अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. सोमवारी दुपारी जेव्हा हे पथक खडकपुरा भागात पोहोचले, तेव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. रस्ते रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे पाडण्याचे काम सुरू असताना, जमलेल्या स्थानिक जमावाने या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला.
महापालिकेच्या जेसीबीवर चढून चालकाला मारहाण
सुरुवातीला प्रशासकीय पथक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये केवळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही वेळातच परिस्थिती हाताबाहेर गेली. आक्रमक झालेल्या जमावाने थेट महापालिकेच्या जेसीबी मशीनवर चढून चालकाला पोलिसांच्या डोळ्यादेखत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मारहाणीचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये जमाव जेसीबी चालकावर तुटून पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाटीचार्ज
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. पोलिसांच्या या कारवाईमुळे जमाव पांगला असला तरी, या संघर्षात जेसीबी चालकासह महापालिकेचे काही कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर खडकपुरा आणि वाघी रोड परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
व्हिडिओच्या आधारे मुख्य हल्लेखोरांची ओळख पटवली
महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे मुख्य हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे.दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम नियमानुसारच राबवण्यात येत आहे. यापूर्वी शहरात अशा प्रकारच्या कारवाईमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी हिंसक वळण लागण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
आता नांदेडमध्ये या घटनेमुळे तणावपूर्ण शांतात आहे, ज्यांची घरं आणि ज्यांची दुकानं तुटतायत त्यांचा प्रपंच रस्त्यावर येतोय, त्यामुळे स्थानिकांचा संताप सहाजिक आहे, मात्र हिंसा हे त्याचं उत्तर नाही, हेही तितकच लक्षात घेतलं पाहिजे. तसेच प्रशासनानंही बुडोझरनं समस्या न सोडवता, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, लोकांना विश्वासात घेऊन…लोकांची पर्यायी व्यवस्था करून…लोकांना पूर्वसूचना देऊनच कारवाई करायला हवी…तर असे वाद नक्कीच टळतील…आणि नांदेडमधील हिंसा आवरण्यात मदत होईल…












