IIT Nagpur student suicide : राज्यात विद्यार्थी आत्महत्येचा (Student suicide) आकडा धक्कादायक बनलाय. आता नागपुरातून जी धक्कादायक बातमी समोर आलीय, कोल्हापूरचा श्रेयस शिकायला नागपूरला गेला, मात्र तो परत कधी आलाच नाही. त्यानं नागपूरमधील IIIT च्या (IIIT Nagput) इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक होत आंदोलन करु लागले. श्रेयश चंद्रकांत माने (Shreyash Chandrakant Mane) या २० वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. श्रेयश हा मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून तो IIIT नागपूरमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगच्या (Computer Science Engineering Student) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.
हेही वाचा – प्रतिभा चाकणकरांची तब्बल ८ तास ईडी चौकशी, खळबळजनक माहिती समोर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रेयश ज्या इमारतीत राहत होता, त्या ११ मजली इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून त्याने उडी घेतली. पहाटेच्या वेळी जेव्हा इतर विद्यार्थी गाढ झोपेत होते, तेव्हा ही घटना घडली. घटनेचा आवाज ऐकताच सुरक्षारक्षक आणि काही विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, श्रेयशच्या आत्महत्येमागे परीक्षेचा तणाव हे मुख्य कारण असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारीच त्याची महत्त्वाची सेमिस्टर परीक्षा सुरू होणार होती.
अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे अत्यंत तणावात
दरम्यान, त्याच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून तो आपला अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे अत्यंत तणावात होता. कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयश काही दिवसांपासून वर्गातही नियमित उपस्थित नव्हता आणि त्याचे काही विषय बॅकलॉग देखील होते. या घटनेनंतर IIIT नागपूरच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये एकत्र येऊन आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या मते, केवळ शैक्षणिक तणावच नाही तर वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा आणि प्रशासनाचे कडक धोरण देखील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर असा आरोप केला की, अशा कठीण प्रसंगात देखील प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य किंवा सांत्वन मिळत नाही.
पोलिसांत या प्रकरणीची आकस्मिक मृत्यूची नोंद
बुटीबोरी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. श्रेयशचा मोबाईल फोन सध्या लॉक असून, तो अनलॉक केल्यानंतर त्याच्या वैयक्तिक किंवा शैक्षणिक तणावाबाबत अधिक स्पष्टता येईल, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. इंजिनिअरिंगसारख्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर पालकांच्या आणि समाजाच्या अपेक्षांचे मोठे ओझे असते. मात्र, शैक्षणिक यशापेक्षा आयुष्य अधिक महत्त्वाचे आहे.
शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे वास्तव
अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगत प्रतिमेला काळीमा फासणारं एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या या राज्यात गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ‘ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाईड्स इन इंडिया’ या ताज्या अहवालानुसार, संपूर्ण देशात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. दिवसागणिक बदलणारी जीवनशैली, वाढती स्पर्धा आणि यशाच्या अवास्तव अपेक्षांच्या ओझ्याखाली राज्यातील तरुण पिढी दबली जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यात १ हजार ७६४ विद्यार्थ्यांची आत्महत्या
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी १ हजार ७०० ते १ हजार ८०० विद्यार्थी आपले जीवन संपवत आहेत. २०२२ च्या आकडेवारीनुसार, राज्यात १ हजार ७६४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हे प्रमाण देशाच्या एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या तुलनेत सुमारे १४ टक्के इतके आहे. गेल्या दशकभराचा विचार केला तर ही संख्या सातत्याने वाढत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांसोबतच आता ग्रामीण भागातील मुलांमध्येही आत्महत्येची प्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या आत्महत्येचे प्रमाणही काही विशिष्ट वयोगटात वाढले आहे, जे अधिक चिंताजनक आहे.












