Kalaram temple : ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक गोष्टी साठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे नाशिक पंचवटी येथील काळा राम मंदिर. या काळाराम मंदिरात आज धर्मध्वजाची पुनर्स्थापना झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांची उपस्थिती होती. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
६४ वर्षांनंतर नवा धर्मध्वज उभारण्यात येणार
श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा (Shri Kalaram Temple Devasthan) प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येणार आहे. १९६२ साली धर्मध्वज उभारण्यात आला होता. वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला आहे. धर्मस्तंभ (ध्वजस्तंभ) अयोध्या येथील नमुन्यावर तसेच धर्मशास्त्रावर आधारित असून सुमारे २१ फूट उंचीचा पितळी (ब्रास) स्तंभ असेल. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय ११ फूट असेल; या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केलेले आहे. धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीतील परंपरा असून धर्म, सत्य, शौर्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे.
काळाराम मंदिर
नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिर हे १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी काळ्या पाषाणात उभारलेले भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक आणि जागृत मंदिर आहे. गोदावरी नदीच्या काठावर, प्रभू राम वनवासात राहिले होते, त्या ठिकाणी हे मंदिर आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मणाच्या काळ्या मूर्ती आहेत, तसेच हे मंदिर सामाजिक सुधारणांचा साक्षीदार आहे. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात स्थित आहे.
जुन्या लाकडी मंदिराच्या जागी १७८२ मध्ये पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले, ज्यासाठी सुमारे १२ वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात (Black stone) केलेले आहे. हे १८ व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. रामनवमी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे, जो चैत्र महिन्यात साजरा केला जातो. या मंदिरात पूर्वी अस्पृश्य (दलित) समाजातील लोकांना प्रवेश नव्हता. ही सामाजिक अन्यायाची मोठी समस्या होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अन्यायाविरोधात मोठा लढा उभारला. १९३० साली ‘काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह’ सुरू करण्यात आला. या आंदोलनाचा उद्देश दलित समाजाला मंदिरात प्रवेशाचा हक्क मिळवून देणे हा होता. यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.












