Mahayuti seat-sharing formula : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत, त्यात महायुतीत आता तीन पक्षांमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेंच सुरू आहे. प्रत्येकजण आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी जोरदार फिल्डिंग लावतोय. मात्र, सर्वात जास्त जागा या भाजपाच्या पारड्यात जाणार आहेत हे स्पष्ट आहे. यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटात नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या वेळी डावलले गेलेल्या निष्ठावंतांना यावेळी तरी संधी मिळणार की यावेळीही सतरंज्या उचलण्याची वेळ येणार? हे पाहाणंही तितकेच महत्वाचं आहे. महायुतीतील संभाव्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाला असून या अंतर्गत भारतीय जनता पक्षाला १२ ते १३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ ते ४ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २ जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर करताच महायुतीमधील अंतर्गत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीचे मतदान १८ जून २०२६ रोजी पार पडणार असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जागावाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली होती, मात्र प्राथमिक स्तरावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळाच्या आधारावर हा १२-३-२ असा जागांचा ताळमेळ बसवण्यात आला आहे.
मित्रपक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी उघड चढाओढ
राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये प्रत्येक जागेवर हक्क सांगण्यासाठी अंतर्गत पातळीवर रणनीती आखली जात होती. विशेषतः कोकण आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरून मित्रपक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी उघड चढाओढ पाहायला मिळत होती. या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि मित्रपक्षांमधील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रत्येक पक्षाच्या प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाचा सखोल आढावा घेण्यात आला. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे संख्याबळ किंवा मतदार जास्त आहेत, ती जागा त्याच पक्षाला दिली जावी या मूळ तत्त्वावर सर्व नेत्यांचे एकमत झाले.
भाजपला सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्ट बहुमत
या सर्वसाधारण सूत्रानुसार भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्ट बहुमत किंवा प्रभावी संख्याबळ असल्याने त्यांच्या वाट्याला १२ जागा येण्याचे संकेत मिळाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ३ जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात २ जागा पडण्याची शक्यता आहे. या प्राथमिक सूत्रामुळे महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. असे असले तरी, काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये स्थानिक राजकीय अपरिहार्यता आणि उमेदवारांची वैयक्तिक ताकद लक्षात घेऊन जागांची अदलाबदल करण्याची जागाही या फॉर्म्युल्यामध्ये ठेवण्यात आली आहे.
उमेदवारांची निवड करण्यासाठी अंतर्गत समित्या
जागावाटपाची ही प्राथमिक चर्चा समोर आल्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातील उमेदवारांची निवड करण्यासाठी अंतर्गत समित्या आणि प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. उमेदवारांची निवड करताना केवळ पक्षाशी असलेली निष्ठा न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता आणि निवडून येण्याची शक्यता या निकषांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. भाजपच्या गोटातून आधीच चाचपणी सुरू झाली असून केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीने अंतिम नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आपापल्या पारंपारिक आणि मजबूत मतदारसंघांवर पकड मजबूत ठेवण्यासाठी तगडे उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे.












