UPSC Prelims Exam 2026: Union Public Service Commission म्हणजेच UPSC आज देशभरात सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा (CSE Prelims 2026) आयोजित करत आहे. ही परीक्षा ऑफलाइन OMR पद्धतीने दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.पहिले सत्र सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत होणार असून दुसरे सत्र दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेत पार पडणार आहे. उमेदवारांना सकाळच्या सत्रासाठी 9 वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रासाठी 2 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे.
933 पदांसाठी 8 लाखांहून अधिक अर्ज
यंदा UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी सुमारे 933 पदांसाठी तब्बल 8,19,372 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेतील वाढता प्रतिसाद लक्षात घेता आयोगाने यंदा कानपूर, मेरठ आणि भुवनेश्वर येथे तीन नवीन परीक्षा केंद्रांची भर घातली आहे.यामुळे परीक्षा केंद्रांची संख्या 80 वरून 83 झाली आहे. आयोगाच्या माहितीनुसार, जवळपास 23 हजार उमेदवारांनी या नव्या केंद्रांची निवड केली आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा
विशिष्ट दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ दिल्ली विभागातच 805 दिव्यांग उमेदवारांना पसंतीचे केंद्र देण्यात आले असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
अॅडमिट कार्डशिवाय प्रवेश नाही
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र (Admit Card) अनिवार्यपणे सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय कोणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
यासोबतच उमेदवारांनी ओळखपत्र म्हणून सरकारमान्य फोटो आयडी — जसे की PAN कार्ड किंवा मतदार ओळखपत्र — सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
केंद्रावर काय नेता येणार?
उमेदवारांना काळा बॉलपेन, पेन्सिल आणि पारदर्शक पाण्याची बाटली नेण्याची परवानगी आहे.
कोणत्या वस्तूंवर बंदी?
परीक्षा केंद्रावर कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यात खालील वस्तूंचा समावेश आहे :
- स्मार्टफोन
- स्मार्टवॉच
- ब्लूटूथ डिव्हाइस
- इअरफोन
- पेजर
- पेन ड्राइव्ह
- कॅलक्युलेटर
परीक्षा केंद्रावर या वस्तू ठेवण्याची सुविधा नसल्याने उमेदवारांनी अशा वस्तू सोबत आणू नयेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेनंतर लगेच Answer Key
यंदा प्रथमच UPSC प्राथमिक परीक्षेनंतर लगेच Answer Key प्रसिद्ध केली जाणार आहे. यापूर्वी अंतिम निकालानंतर अनेक महिन्यांनी Answer Key जाहीर केली जात होती.
आयोगाच्या मते, या नव्या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार असून उमेदवारांना स्वतःच्या कामगिरीचे त्वरित मूल्यमापन करता येणार आहे.
सामान्यतः UPSC प्रिलिम्सचा निकाल परीक्षा झाल्यानंतर 30 ते 40 दिवसांच्या आत जाहीर केला जातो.







