Jalgaon Flood: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरात एका नागरिकाने अक्षरशः मृत्यूशी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला. पुराच्या पाण्याने चारही बाजूंनी वेढा घातल्याने त्यांना तब्बल पाच तास झाडावरच थांबावे लागले. या काळात झाडावर चढलेल्या विषारी नागांमध्ये त्यांची परीक्षा आणखी कठीण झाली.
चावलखेडा गावातील सुरेश भील हे नेहमीप्रमाणे नदीकाठी मासेमारीसाठी गेले होते. मात्र, मुसळधार पाऊस (Jalgaon Flood) आणि धारणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. परिस्थिती गंभीर होताच त्यांनी जवळील झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा: तुम्हीही फ्रिजमध्ये हे पदार्थ ठेवता का? थांबा! यामुळे चव आणि गुणवत्ता होऊ शकते खराब
झाडावरही संकटाचा सामना
सुरेश भील झाडावर सुरक्षित असल्याचे वाटत असतानाच काही विषारी नागही पाण्यापासून बचावासाठी त्याच झाडावर चढले. खाली प्रचंड वेगाने वाहणारा पूर आणि वर नागांचा धोका अशा दुहेरी संकटात त्यांनी धैर्य न सोडता झाडाच्या फांद्या तोडून सापांना दूर करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा बचाव केला.
पाणी ओसरताच पोहत गाठला किनारा
सुमारे पाच तास झाडावर अडकून राहिल्यानंतर पुराचे पाणी काहीसे ओसरले. त्यानंतर सुरेश भील यांनी धाडस दाखवत नदी पोहत पार केली आणि सुरक्षित बाहेर पडले. या घटनेनंतर त्यांनी ग्रामस्थ आणि प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रशासनाचे मानले आभार
आपल्या सुटकेसाठी ग्रामस्थांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परिस्थिती लक्षात घेऊन धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांचेही त्यांनी आभार मानले.
चाळीसगावातही पावसाचा मोठा फटका
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून केळीसह अनेक पिके पाण्याखाली गेली. काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या, तर घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, बाधित शेतकरी आणि नागरिकांनी तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
FAQs
1. जळगावमध्ये नागरिक किती वेळ झाडावर अडकून होता?
उत्तर: सुरेश भील हे पुराच्या पाण्यात तब्बल पाच तास झाडावर अडकून होते.
2. झाडावर असताना त्यांच्यासमोर कोणते संकट उभे राहिले?
उत्तर: पुरापासून बचावासाठी काही विषारी नागही त्याच झाडावर चढल्याने त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला.
3. सुरेश भील यांची सुटका कशी झाली?
उत्तर: पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्यांनी धाडसाने नदी पोहत पार केली आणि सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचले.
4. चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे काय नुकसान झाले?
उत्तर: ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली, शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले तसेच अनेक पिके पाण्याखाली गेली.









