Supriya Sule Horse Trading Allegations : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यासाठी १८ जून रोजी १७ जागेंवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच राजकारणात मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरु झाला असल्याचे अनेक नेत्यांनी मोठमोठे आरोप केले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घोडेबाजारी वरून जुंपली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुख्य नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार निशाना साधला आहे. त्यांनी म्हटलंय कि, महायुतीने पैशांच्या बळावर लोकशाहीचा लिलाव मांडलाय. माझ्याकडे याचे पक्के पुरावे आहेत. मुख्यमंत्र्यांनी मागितले तर द्यायला तयार आहे. त्यामुळे मला तोंड उघडायला लावू नका. लोकशाहीचा हा गलिच्छ प्रकार थांबवण्यासाठी संसदेत एक खाजगी विधेयक आणणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
माणसांना पैशांपेक्षा प्रेमाने, विश्वासाने आणि आदराने’ जिंकता येतं – फडणवीस
खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीये. फडणवीस म्हणताहेत कि, माणसांना पैशांपेक्षा प्रेमाने, विश्वासाने आणि आदराने’ जिंकता येतं. जर विरोधकांना हे गणित समजलं, तर त्यांना असल्या कायद्यांची किंवा विधेयकांची गरजच पडणार नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. जेव्हा नेत्यांचा आपल्या नेतृत्वावरचा विश्वास उडतो, तेव्हाच ते पक्ष सोडतात. याला घोडेबाजार म्हणण्यापेक्षा विरोधकांचं अपयश म्हणता येईल, असं फडणवीस म्हणाले आहेत.
काँग्रेसचे ६० पेक्षा जास्त नगरसेवक अचानक नॉट रिचेबल
हा वाद इथेच संपत नाही, विरोधकांनी थेट आकड्यांची लिस्टच बाहेर काढलीये. पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीचे काँग्रेसचे ६० पेक्षा जास्त नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यांना क्रॉस व्होटिंगसाठी प्रत्येकी ५-५ लाख रुपयांचा टोकन मनी दिलाय आणि रिसॉर्ट पॉलिटिक्ससाठी थेट गोव्याला पाठवलंय, असा थेट आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केलाय. काँग्रेस आता या नगरसेवकांच्या घरांवर नोटिसा आणि व्हीप चिकटवणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी दिवसाला 150 कोटी रुपयांचा वापर
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत एका दिवसामध्ये 150 कोटी रुपयांचा वापर करण्यात आला, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करत खळबळ उडवून दिली. या आरोपानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. ज्यानंतर आज रविवारी पुन्हा एकदा राऊतांनी या आरोपांवर ठाम राहात, विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला, हे सत्ताधाऱ्यांनी मान्य करावे, असे म्हटले आहे. यावेळी राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. माणसे प्रेमाने जिंकता येतात, मग 50-50 कोटींचा काय प्रकार होता? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.





