उल्हासनगरमधून एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून प्री स्कूलमधील एका चिमुकल्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता मनसेने दखल घेतली असून मनसे या प्रकरणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर आंदोलन करत शाळेचा बॅनर फाडला. तसेच संबंधित शिक्षिकेला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात देखील आली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
उल्हासनगरमध्ये एक्सलंट किडवर्ल्ड या शाळेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या व्हिडिओत शिक्षिका कविता शिकवत असताना, एक चिमुकला टाळ्या वाजवत नव्हता. त्या कारणावरुन शिक्षिकेने त्याला मारहाण केली. या एक मिनीटांच्या व्हिडिओमध्ये, शिक्षीका त्या चिमुकलीच्या गालावर चापट मारताना दिसत आहे. तसेच यामध्ये शेवटी तो चिमुकला तिचा हात पकडत तिला प्रतिकार करताना देखील दिसत आहे. ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये पसरल्यानंतर संबंधित शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विठ्ठलवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार उजेडात आल्यानंतर सोमवारी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी शाळेचा बॅनर फाडत शाळेच्या बाहेर गोंधळ घातला. घटनेविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानतंर पोलिसांनी मनसे कार्यकर्तांना बाजूला केले. त्यानंतर या प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना एक निवेदन देत संबंधित शिक्षिकेला लवकरात लवकर अटक करुन दोषींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला आहे.
या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांचे पोलिस व्हेरीफिकेशन करावे. तसेच त्यांची मानसिक चाचणी झाली पाहिजे आणि शाळेच्या सर्व रुममध्ये सीसीटीव्हीत हवेत, अशा मागण्याचे निवेदन मनसे पदाधिकारी बंडू देशमुख यांनी पोलिसांना दिले. या प्रकरणी प्रसारमाध्यमांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधला असता, शाळा प्रशासनाकडून कोणी बोलण्यास तयार नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासन यापुढे अशा घटना होवू नये, यासाठी काय उपाय योजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.