Raj Thackeray On Ajit Pawar Plane Crash | आज (27 फेब्रुवारी) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघात प्रकणी रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना सर्व माहिती दिली. रोहित पवारांकडून या प्रकरणाची सर्व माहिती घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत सरकार FIR ला घाबरत आहे का? असा खोचक सवाल केला.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, रोहित पवार अजितदादांच्या अपघात प्रकरणात (Ajit Pawar Plane Crash) गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मग गुन्हा का नोंदवला जात नाही. तीन तीन ठिकाणी दबाव का टाकला जात आहे. एफआयआर का नोंदवला जात नाहीये. जर रोहित पवारांचा एफआयआर नोंदवला जात नसेल तर सामान्य माणसाचं काय करायचं, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.
एफआयआर नोंदवला जात नसेल तर काहीतरी काळंबेरं आहे
पुढे ते म्हणाले, आज आपल्यातील एक व्यक्ती अपघातात गेली. असा दुर्दैवी अपघात कोणाचाच होऊ नये. तसेच अशावेळी जर एफआयआरमध्ये काही त्रुटी मांडायच्या असतील आणि त्या मांडल्या जाऊ देत नसतील तर आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेला चालला आहे. अधिकाऱ्यांना सरकार एफआयआर नोंदवून देत नसेल तर अधिकाऱ्यांना दोष देऊन फायदा काय. अजितदादांसारख्या व्यक्तींबाबत जर सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसेल तर यामध्ये काहीतरी काळंबेरं आहे का. अशा गोष्टींमुळे संशयाची भूतं नाचवली जात आहेत.त्यामुळे याप्रकरणी आधी सरकारचाच कान धरला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.












