Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शिवराय पुतळा वाद! चिखला गावात प्रशासनाकडून संचारबंदी बंदी, २३ जणांना अटक
Top News

शिवराय पुतळा वाद! चिखला गावात प्रशासनाकडून संचारबंदी बंदी, २३ जणांना अटक

Shivaji Maharaj statue controversy

Shivaji Maharaj statue controversy : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन सुरु झालेला वाद आता टोकाला पोहोचला आहे. विनापरवानगी पुतळा बसवणे, प्रशासनाची कारवाई आणि त्यानंतर झालेली हाणामारी यामुळे गावात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर आता प्रशासनाने कलम १६३ (संचारबंदी) लागू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह २३ जणांना अटक केली आहे.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका आयुक्तांना एक पत्र अन् बिल्डरांचे धाबे दणाणले

बुलढाण्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरुन होणाऱ्या संघर्षाची सुरुवात ४ फेब्रुवारी रोजी झाली. चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित केला. हा पुतळा स्थापन करण्यासाठी कोणतीही प्रशासकीय परवानगी नव्हती, असा अहवाल देण्यात आला. हा अहवाल मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालय लोणार यांनी ११ फेब्रुवारी रोजी हा पुतळा हटवण्याचे आदेश दिले. मात्र, २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री प्रशासकीय आदेशाला न जुमानता संतप्त शिवप्रेमींनी गावात पुन्हा अश्वारूढ पुतळ्याची स्थापना केली. यामुळे दोन गटांत तीव्र वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध

या वादादरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला. पुतळा हटवण्याच्या प्रक्रियेला विरोध करत असताना काही समाजकंटकांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अश्लील वर्तन झाल्याचाही आरोप केले जात आहे. आता या घटनेचा राजकीय वर्तुळातून याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली

याप्रकरणी आता सध्या पोलीस कारवाई केली जात आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. यावेळी गावचे सरपंच गणेश काकड यांना वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली असून, ३८ हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या गावात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला

या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. सिंदखेडराजा शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या काही नेत्यांकडून विशिष्ट समाजाबद्दल द्वेष पसरवला जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रशासनाला २४ फेब्रुवारीपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करा, असा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला आहे.

केवळ दोषींवरच कारवाई व्हावी, निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये

दरम्यान पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ आणि वस्तुस्थिती मांडण्यासाठी वंजारी समाजातर्फे आज गावात सत्य कथन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ दोषींवरच कारवाई व्हावी, निष्पाप लोकांना त्रास दिला जाऊ नये, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काही मोठी कारवाई होणार का, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास परवानगी दिली जाणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts