गडचिरोली: देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्ह्यातील आलापल्ली येथील विश्वेश्वरराव आत्राम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी क्षेत्रातील राज्यातून उत्कृष्ट संस्था म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते शनिवारी (२१ मार्च) राजभवन, मुंबई येथे प्राचार्य वैभव बोंगीरवार यांनी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
हेही वाचा: इंदापूर-बावडा परिसरात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; अंकिता पाटील ठाकरे यांनी केली पाहणी
यावेळी आदिवासी क्षेत्रातील विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आलापल्लीला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आयटीआय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लॉयड्स मेटल अॅण्ड एनर्जी लिमिटेड कं पनीमध्ये संस्थेच्या ७८ प्रशिक्षणार्थ्यांना नियमित रोजगार मिळाला आहे.
उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेंतर्गत जवळपास तीन कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास १६ लाख इतका एकूण महसूल शासनास प्राप्त झाला आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्था सामाजिक बांधिलकी जपत एनएसएस अंतर्गत भामरागड तालुक्यातील कोठी व पोयरकोठी येथील पूरपीडित २०० घरांचे इलेक्ट्रिफिकेशन करून दिले आहे. विश्वेश्वरराव आत्राम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्यांसोबत संस्थेचे आदिवासी वेशभूषेत असलेले प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.












