Bramhapuri Missing Girls: विधानसभेत २४ मार्च रोजी स्थगन प्रस्ताव मांडताना विजय वडेट्टीवार कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. आपल्या मतदारसंघातील म्हणजेच ब्रम्हपुरीतील उदाहरण देत त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत १० वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत.
LS मराठी पत्रकार,
चंद्रपूर: राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे,” अशी तोफ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत डागली. ब्रह्मपुरीतील धक्कादायक आकडेवारी मांडत त्यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले.
हेही वाचा: Bhandara: बाप रे! शिक्षणासाठी मृत्यूच्या छायेत ‘वारी’; भंडारा जिल्ह्यात चिमुरड्यांचा जीवघेणा प्रवास
६ अल्पवयीन मुली बेपत्ता
विधानसभेत २४ मार्च रोजी स्थगन प्रस्ताव मांडताना विजय वडेट्टीवार कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. आपल्या मतदारसंघातील म्हणजेच ब्रम्हपुरीतील उदाहरण देत त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत १० वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या ६ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. यापैकी केवळ दोन मुलींचा तपास लागला असून, ४ मुली अजूनही बेपत्ता आहेत. “मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलीस यंत्रणा नेमकी काय करत आहे?” असा तिखट सवाल त्यांनी गृहखात्याला विचारला.
ही व्यवस्था नेमकी कुठे आहे?
सरकार सीसीटीव्ही बसवण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा दावा करते. मात्र, तालुका स्तरावर ही व्यवस्था नेमकी कुठे आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत व्यापक प्रबोधन करण्याची गरज व्यक्त करत, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी तात्काळ ‘विशेष पथक’ (Special Squad) नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.












