• Home
  • राजकारण
  • अर्थमंत्र्यांची मतदारांना थेट ऑफर! अर्थ खातं माझ्याकडे, मत द्या अन् निधी घ्या..
Top News

अर्थमंत्र्यांची मतदारांना थेट ऑफर! अर्थ खातं माझ्याकडे, मत द्या अन् निधी घ्या..

Finance Minister Ajit Pawar's offer to voters

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदारांना थेट ऑफर दिली आहे. तुम्ही माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून दिलं तर, मी निधीत काट मारणार, असं सुचक विधान केलं आहे. त्यामुळे मत द्या अन् निधी घ्या, अशी अर्थमंत्र्यांकडून थेट ऑफरचं सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली. “एका झटक्यात सगळी काम होत नाहीत. त्यासाठी व्हिजन लागतं. मतभेद असले तरी बाजूला ठेवावे लागतात. अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं वाढपी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिले, तर मी निधीत काट मारणार, असे सूचक विधान करत माळेगावकरांना आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. १८ उमेदवार निवडून द्या मी बोललेले सगळं करणार,” असंही आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

हेही वाचा – भाजपची बिनविरोध सेंचुरी! स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानापूर्वीच १०० जागा जिंकल्या..

मी काय साधू संत नाही..

“आम्ही ज्या अठरा लोकांचे पॅनल उभं केलं आहे त्यांना निवडून द्या. मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला विकासाची काम करून देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. कोणी संपत नसतं त्यामुळे संकुचित विचार ठेवू नका, मन मोठं करा. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते. सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे,” असंही अजित पवार म्हणाले.

तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही- अजित पवार

माळेगाव नगरपंचायतीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याची क्षमता केवळ आपल्याकडेच आहे. “माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त पाच-सहा कोटी रुपयांचं. त्यात तुम्ही कितीही वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही. बारामतीचा विकास जसा हजारो कोटी आणून झाला, तीच गोष्ट आपल्याला माळेगावला करायची आहे.” माळेगाव नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल, तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांमध्ये ‘एक नंबरची नगरपंचायत’ माळेगावची व्हावी -अजित पवार

आपण शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती-धर्माला, सर्व समाजघटकाला एकत्र पुढे घेऊन चाललो आहोत. ही निवडणूक फक्त निवडणूक नाही; ही माळेगावच्या विकासाची मोठी संधी आहे. योग्य उमेदवार निवडणं ही मतदारांची मोठी जबाबदारी आहे. नगराध्यक्ष पदासाठी आम्ही सुयोग सातपुते यांच्यावर विश्वास टाकला आहे. मला खात्री आहे की, मतदार राजा त्यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करेल. माळेगावचा विकास पारदर्शक झाला पाहिजे, नियोजनबद्ध झाला पाहिजे. नागरिकांना उत्तम वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, रस्ते, पाणी, नवीन शासकीय इमारती आणि अत्याधुनिक सोयी मिळाल्या पाहिजेत. ह्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी सत्ता मिळणं आवश्यक असतं. त्या दृष्टीनं आम्ही ते काम करण्यासाठी तत्पर आहोत. महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांमध्ये ‘एक नंबरची नगरपंचायत’ माळेगावची व्हावी, हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts