कोलकाता Chandranath Rath Murder : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचंड विजयानंतरही बंगालमध्ये हिंसा सुरुच आहे. निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची बुधवारी रात्री (6 मे) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा, मध्यमग्राममध्ये सुवेंदू यांचे पीए चंद्रनाथ यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीत लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत गाडीच्या चालकालाही गोळी लागली. चालकाला एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा : बंगळूरु नव्हे तर ‘या’ शहरात होणार IPL फायनल; बीसीसीआयनं केली
टीएमसीचा हात असल्याचा आरोप :
सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ यांची हत्या कोणी केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी या हत्येमागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसनंही एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केलं आहे. तृणमूल काँग्रेसनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून, या हत्येमध्ये त्यांच्या पक्षाचा किंवा कार्यकर्त्यांचा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असाही आरोप केला आहे की, या हत्येमध्ये टीएमसीचे कार्यकर्ते सामील आहेत.
तृणमूल काँग्रेसचं मोठं निवेदन :
तृणमूल काँग्रेसनं लिहिलं, “आज रात्री मध्यमग्राममध्ये चंद्रनाथ रथ यांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो. इतकंच नव्हे, तर गेल्या तीन दिवसांत निवडणुकीनंतरच्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेसच्या इतर तीन कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येचाही आम्ही निषेध करतो; आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा-समर्थित समाजकंटकांनी हे हिंसक कृत्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शक्य तितक्या कठोर कारवाईची आम्ही मागणी करतो, ज्यात न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचा समावेश आहे, जेणेकरून गुन्हेगारांना ओळखून त्यांना विनाविलंब न्याय मिळवून दिला जाईल. लोकशाहीत हिंसाचार आणि राजकीय हत्यांना स्थान नाही आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर जबाबदार धरलं पाहिजे.”
चंद्रनाथ रथ कोण होते? :
गेल्या पाच वर्षांपासून चंद्रनाथ रथ हे पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचं उजवे हात म्हणून काम पाहत होते आणि त्यांना सुवेंदू अधिकारी यांच्या अत्यंत जवळचं मानलं जात होतं. त्यांचं निधन हा सुवेंदू अधिकारी आणि भाजपसाठी एक मोठा धक्का आहे. चंद्रनाथ हे सुवेंदू यांच्या सर्व बैठका आणि संवाद सांभाळत होते. नुकत्याच झालेल्या बंगाल निवडणुकीसाठी त्यांनी सुवेंदू यांची सर्व वैयक्तिक आणि राजकीय प्रकरणे हाताळली होती.
ही घटना कशी घडली? :
मिळालेल्या माहितीनुसार, पीएवर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. मध्यमग्राममधील दोहरियाजवळ गाड्यांच्या एका गटानं चंद्रनाथ यांची गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर गुन्हेगारांनी चंद्रनाथ यांच्यावर गोळीबार केला, ज्यात चार गोळ्या लागून त्यांचा मृत्यू झाला. चालकही गोळी लागून जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गाडीला नंबर प्लेट नव्हती, त्यामुळं गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून तपासणी नाके उभारले आहेत. गुन्हेगारांचा शोध सुरु आहे.






