Mumbai Rain Alert: राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, पुढील ८ दिवस मुंबई, कोकण, पुण्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात मान्सूनने आता चांगलाच जोर धरला असून अनेक भागांत मुसळधार पावसाची नोंद होत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः १ जुलैपासून अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: खासदार होताच पार्थ पवारांचं प्रमोशन मिळाली मोठी जबाबदारी मंत्रीही होणार?
अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस
कोकण, मुंबई महानगर परिसर, पुणे तसेच मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस झाला. मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत कायम होता. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
पुढील आठ दिवस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठ दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान इशारे जारी करण्यात आले
जूनच्या शेवटी राज्यभर मान्सून सक्रिय झाल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे 29 जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे हवामान इशारे जारी करण्यात आले आहेत.
मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि गोरेगाव परिसरातही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाणे जिल्ह्यात काही भागांत झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या असून स्थानिक प्रशासन सतर्क आहे.
चेंबूर परिसरात थरारक दुर्घटना
दरम्यान, काल चेंबूर परिसरात पावसाआधीच एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरवून सोडलाय. चेंबूरमधील वर्दळीच्या ११ नंबर रोडवर एका शाळेची बस नियमित वेळेनुसार विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना, अचानक रस्त्याच्या कडेला असलेले एक जुने आणि मोडकळीस आलेले प्रचंड मोठे झाड या धावत्या स्कूलबसवर कोसळले आहे.चेंबूर शाळेच्या बसवर झाड कोसळलं या भीषण अपघातात स्कूलबसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून प्राथमिक माहितीनुसार १० शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाची परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवावे तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











