Accident on the Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अपघात थांबायचे नावच घेत नाहीत. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जण (Three killed) जागीच ठार झालेत. तर चार जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नियंत्रण सुटलेल्या कंटेनर ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर तो उलटून इनोव्हा कारवर कोसळल्याने हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार भरधाव वेगातील कंटेनर चालकाचा ताबा सुटला. त्याने मार्गावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कंटेनर डाव्या बाजूला उलटून थेट इनोव्हा कारवर पडला. या भीषण दुर्घटनेत इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकूण पाच वाहने या अपघातात नुकसानग्रस्त झाली. या अपघातानंतर बचाव कार्य सुरु करण्यात आले. याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हे ही वाचा: मातोश्रीच्या गोटात पुन्हा एकदा चिंता; ठाकरे यांचे निम्मे खासदार शिंदेच्या संपर्कात?
अपघातातील मृत व्यक्तींची नावे
अंबादास दामू पेटारे
श्रीकांत अनंत जाधव
प्रमोद संतोष पवार
महामार्ग विभाग लक्ष देणार का?
गेल्या महिन्यात आडोशी बोगद्याजवळ गॅस वाहू टँकर कोसळून अपघात झाला होता. त्यावेळीही किमान २७ तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वारंवार अपघातग्रस्त का होतोय? असा सवाल विचारला जात आहे. अपघातांमुळे या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अपघात टाळणायसाठी महामार्ग विभाग काय उपाय योजना आखणार का? असाही सवाल केला जात आहे.
रस्ते अपघात टाळण्याचे महत्त्वाचे उपाय
वेगावर नियंत्रण: वाहनाचा वेग नेहमी मर्यादित ठेवा, विशेषतः वळणदार आणि अरुंद रस्त्यांवर
सुरक्षा साधनांचा वापर: दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकीमध्ये सीट बेल्ट अनिवार्य वापरा
मोबाईलचा वापर टाळा: गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा मेसेज करणे टाळा, यामुळे लक्ष विचलित होते
मद्यपान टाळा: दारू किंवा नशेत गाडी चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण आहे, ते टाळा .
वाहन तपासणी: ब्रेक, टायर्स, दिवे आणि आरसे याची नियमित तपासणी करा
वाहतूक नियम: ट्रॅफिक सिग्नल पाळा, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करू नका आणि झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा
सतर्कता: रात्रंदिवस चालवणे टाळा आणि थकवा असल्यास गाडी चालवू नका.









