Dr Madhav Gadgil death : भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ तथा पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, निसर्गप्रेमी डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांनी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे 7 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं अभ्यासू संवेदनशील शास्त्रज्ञ देशाने गमावला आहे.
भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक नाव म्हणजे डॉ. माधव गाडगीळ. त्यांनी आयुष्यभर पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका बजावली. जंगल, नद्या, डोंगररांगा आणि ग्रामसमुदाय यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. आणि अनेक संशोधन लेख, पुस्तके आणि अभ्यास अहवाल सादर केले. त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र तसेच नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मूलभूत आणि दिशादर्शक संशोधन केले. त्यांच्या अभ्यासामुळे पर्यावरणीय समस्या समजून घेण्यास वैज्ञानिक अधिष्ठान मिळाले.
हे ही वाचा : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित
डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे भारताने पर्यावरणीय संशोधनात अग्रगण्य, निर्भीड आवाज गमावला आहे. त्यांना पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक असे पर्यावरण अभ्यासक आणि संशोधक घडले. डॉ गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण प्रेमी, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
पुरस्कार
माधव गाडगीळ यांना पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त आहेत. त्यापैकी त्यांना 1981 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कार, 1986 शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, 2015 मध्ये टाईलर पुरस्कार , 2024 मधेय संयुक्त राष्ट्रांचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला आहे.







