Mira Bhayandar mayor post controversy : मीराभाईंदर महानगरपालिकेत उत्तर भारतीय महापौर व्हावा, यासाठी जास्तीत जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणले जातील, असे वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने मीरा–भाईंदर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मीरा–भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी माणूसच बनणार
मनसेच्या बॅनरवर “मीरा–भाईंदर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी माणूसच बनणार” असा ठळक मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच, “भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावलणाऱ्या मोठ्या पक्षाच्या ‘रावणाचा’ येत्या १६ तारखेला मीरा–भाईंदरकर दहन करतील” असे आक्रमक विधानही या बॅनरमध्ये करण्यात आले आहे. या माध्यमातून मनसेने भाजपवर थेट हल्लाबोल करत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
हे ही वाचा : मुरलीधर मोहोळ यांचा अजित पवारांवर घणाघात; गुन्हेगारी संपवा म्हणतात, पण उमेदवारी कुणाला देता
दरम्यान, काही दिवसांपूर्वी २३ डिसेंबर रोजी भाईंदर पूर्व येथील काजल ग्राउंडवर उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने आयोजित सभेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृपा शंकर सिंह यांनी हे वक्तव्य केले होते.
मनसेने घेतली आक्रमक भूमिका
“आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की मीराभाईंदर महापालिकेत उत्तर भारतीय महापौर होईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. कृपा शंकर सिंह यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने मीरा–भाईंदर शहरातील राजकारणात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.












