Sanjay Raut statement : सध्या राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सभा, दौरे, मुलाखती आणि जाहिरातींचे रान उठवले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे युतीमधले लूझर आहेत, अशी टीका केली होती. त्यांच्या या टिकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. राऊत म्हणाले, “पाहू ना कोण लूझर आहे आणि कोण विनर आहे. ते या मुंबईची जनता ठरवेल ना. आणि मुंबईतली जनता ही कायम ठाकऱ्यांच्याच मागे उभी राहिली आहे ते फडणवीसांनाही चांगलं माहीत आहे. ठाकऱ्यांशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा.. हे लक्षात ठेवा” असं राऊत म्हणाले.
हेही वाचा – काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजपा काँग्रेस युक्त झाली? विरोधकांचा खोटक सवाल
आमची आधीची एक पिढी शहीद झाली
आम्ही मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालो, म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात टिकली. आणि तुम्ही मुंबईत राहू शकताय. का राहताय ? आम्ही मुंबईत संघर्ष करून म्हातारे झालो, आमची एक आधीची पिढी शहीद झाली म्हणून तुम्हाला या मुंबईत बसून महाराष्ट्रावर राज्य करता येतंय मि. फडणवीस अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं. तुम्ही तरूण आहात अजून, नागपूरचा काय विकास केलात मग ? लोकं तुम्हाला दारातून हाकलून देत आहेत, ते मी बघितलं आहे असंही राऊतांनी म्हटलं.
‘आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर‘ – संजय राऊत
“राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरच ठरवल्यामुळे मी आता अधिकृतपणे ‘सर्टिफाईड नागपूरकर’ झालो आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. ते नागपूरकर असतील तर चांगली गोष्ट आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुम्ही ‘सर्टिफाईड नागपूरकर’ आहात, आम्हीसुद्धा ‘डबल सर्टिफाईड मुंबईकर’ आहोत असं त्यांनी सुनावलं. मि. फडणवीस आम्ही मुंबई ही लढून मिळवली आहे. जमिनीतून बटाटे, भुईमुगाच्या शेंगा येतात तसं हे आम्हाला आयतं मिळालेलं नाहीये. ही मुंबई लढून मिळवली. आणि जेव्हा आम्ही लढत होतो, तेव्हा फडणवीसांचा जन्मही झालेला नव्हता. यांना गब्बर सारखे डायलॉग मारायला काय झालं? अशा शब्दांत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं.











