खासदार संजय दिना पाटील :
Sanjay Raut: ईशान्य मुंबईतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक भांडून येथील संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून संजय दिना पाटील यांच्या कथित धमकीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. आंदोलन करणाऱ्या आणि जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा: आता तुकाराम मुंढे यांची बदली होणार का नाही? विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केली भूमिका
राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “आंदोलन केल्यास स्मशानात पाठवू, हॉस्पिटलमध्ये पाठवू किंवा बॉम्ब टाकू,” अशा स्वरूपाची विधाने अत्यंत चिंताजनक आहेत. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याचा तसेच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय, संजय दिना पाटील यांनी “मी यापूर्वी पाच जणांना ठार केले आहे” असा दावा केल्याचे सांगत राऊत यांनी या वक्तव्याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर असे वक्तव्य खरोखरच करण्यात आले असेल, तर त्यामागील तथ्य समोर यावे आणि संबंधित बाबींची सखोल तपासणी व्हावी, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
धमकीवरूनही राऊत यांनी गंभीर प्रश्न
बॉम्ब टाकण्याच्या धमकीवरूनही राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “बॉम्बचा उल्लेख केला जात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. अशा प्रकारचे साहित्य किंवा त्यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास तपास यंत्रणांनी त्याचा शोध घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. राऊत यांच्या समर्थनार्थ ईशान्य मुंबईतील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












