Tukaram Mundhe Transfer: अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीच्या सर्वत्र चर्चा सुरू असताना विधानसभेत नरहरी झिरवाळ यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते काय म्हणाले जाणून घ्या.
अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चादरम्यान विधानसभेत या विषयावर महत्वपूर्ण चर्चा झाली. विभागाने राज्यभर राबवलेल्या भेसळविरोधी मोहिमेचे कौतुक करत अनेक सदस्यांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे समर्थन केले आणि त्यांची बदली टाळण्याची मागणी केली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत विविध पक्षांच्या आमदारांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अवैध व्यवसायांविरोधातील कारवाईबाबत समाधान व्यक्त केले. या मोहिमेमुळे विभागाची प्रतिमा अधिक प्रभावी झाली असून जनतेतही सकारात्मक संदेश गेल्याचे सदस्यांनी नमुद केले.
हेही वाचा: आजच्या दिवशी चुकूनही विसरू नका! विष्णूपूजेत अर्पण करा हे 4 शुभ नैवेद्य; मिळवा श्रीहरींचा आशीर्वाद
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री झिरवाळ आणि आयुक्त मुंढे यांनी एकत्रितपणे काम करून राज्यातील भेसळमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले.
तुकाराम मुंढेचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे धाडसी कारवाईचे विशेष कौतुक केले. भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे त्यांना धमक्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्यांनी मुंढे यांना आवश्यक सुरक्षा देण्याची तसेच त्यांची किमान तीन वर्षे बदली न करण्याची मागणी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विभागाच्या कार्यक्षमतेसाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवायांना आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
भेसळयुक्त अन्नपदार्थांचे मोठे योगदान
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्यातील अनेक आजारांच्या वाढत्या प्रमाणामागे भेसळयुक्त अन्नपदार्थांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने घेतलेल्या कारवायांमुळे हा विषय प्रथमच व्यापक चर्चेत आल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, आमदार सुनील शेळके यांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या भेसळखोरांवर अधिक कठोर कारवाईची गरज व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अशा प्रकरणांमध्ये संबंधितांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असे स्पष्ट केले.
चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी मंत्री झिरवाळ आणि आयुक्त मुंढे यांच्यातील समन्वयामुळे विभागाची कार्यक्षमता वाढल्याचे मत व्यक्त केले. राज्यात भेसळमुक्त अन्नव्यवस्था निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असल्याचे चित्र विधानसभेत पाहायला मिळाले.










