दुबई : 19 वर्षांखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात हा ब्लॉकबस्टर जेतेपदाचा सामना होणार आहे. भारतानं सेमीफायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव केला, तर पाकिस्ताननं बांगलादेशला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. गोलंदाजांनंतर, आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रानं भारताच्या सेमीफायनल विजयात चमक दाखवली आणि अर्धशतकं झळकावली. पावसामुळं प्रभावित झालेला सामना प्रत्येकी 20 षटकांचा करण्यात आला. भारतासमोर 139 धावांचं लक्ष्य होतं, जे संघानं 8 विकेट्स आणि दोन षटके शिल्लक असताना साध्य केलं.
दोन फलंदाजांची झळकावली अर्धशतकं :
धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात नव्हती. संघानं 25 धावांमध्ये दोन विकेट्स गमावल्या. प्रथम, कर्णधार आयुष म्हात्रे (7) स्वस्तात बाद झाला, त्यानंतर वैभव सूर्यवंशीही बाद झाला, त्यानं दोन चौकार मारत 9 धावा केल्या. त्यानंतर, आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रानं संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं. दोन्ही फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली, तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची मोठी भागीदारी करत अर्धशतकं झळकावली. आरोननं नाबाद 58 धावा केल्या, ज्यामध्ये चार चौकार आणि एक षटकार होता. दरम्यान, विहाननं 61 धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये त्यानं चार चौकार आणि दोन षटकार मारले. यामुळं भारताला फक्त दोन गडी गमावून 139 धावा करून विजय मिळवून दिला.
The most intense rivalry in world cricket finds its way back to the final stage 🙌
India U19. Pakistan U19. No margins. No second chances. 🇮🇳🇵🇰
Tomorrow, it’s all on the line as they battle for the coveted #DPWorldMensU19AsiaCup2025 🏆#GrandFinale #INDvPAK #ACC pic.twitter.com/WQLYdxdos7
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 20, 2025
भारत आणि पाकिस्तान कधी भिडणार? :
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विजेतेपदाचा सामना रविवार, 21 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर सकाळी 10:30 वाजता सुरु होईल. भारत आठव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे, तर पाकिस्तान चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे.
हे ही वाचा : टी-20 विश्वषकासाठी टीम इंडियाची घोषणा; गिल संघाबाहेर
पाकिस्ताननं बांगलादेशला हरवलं :
एकीकडे भारत अंतिम फेरीत पोहोचला, तर दुसरीकडे पाकिस्ताननं कमी धावसंख्येच्या सामन्यात बांगलादेशला हरवलं. अब्दुल सुभान (4 विकेट) च्या घातक गोलंदाजीमुळं बांगलादेशचा संघ 121 धावांवर गुंडाळला. पाकिस्ताननं 17व्या षटकात लक्ष्य गाठलं. सलामीवीर समीर मिन्हासनं 69 धावांची नाबाद खेळी केली. उस्मान खाननं 27 धावा केल्या. अहमद हुसेन 11 धावांवर नाबाद राहिला.












