Mumbai | आजकाल किरकोळ वादावरून हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आताही एक अशीच घटना घडली आहे ज्यामुळे मुंबईला (Mumbai) हादरवून सोडले आहे. मुंबईमध्ये किरकोळ वादातून भररस्त्यात एका तरूणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
किरकोळ वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला?
मुंबईतील गोरेगावच्या बांगुरनगर या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. एका दुचाकीला कॅबचालकानं मागून जोरात धडक दिली. त्यानंतर कॅबचालक आणि दुचाकीस्वारात कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके टोकाला गेले की ते मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचले. या मारहाणीत दुचाकीस्वार तरूणावर कॅबचालकानं धारदार शस्त्राने वार केले आणि तरूणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (14 मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. शरीफ अन्सारी (वय २७) नावाचा एक तरूण मालवणी बॅक रोडवरून गोरेगावच्या दिशेने जात होता. त्यावेळी मागून येणाऱ्या एका कॅबने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. कॅबमध्ये चालक सत्येंद्र गुप्ता (वय 28) आणि प्रवासी सुनील पाल (वय 27) हे दोघे होते. तर कॅबने दुचाकीला धडक दिल्यामुळे शरीफ अन्सारी संतप्त झाला आणि त्याने कॅबला अडवून हेल्मेटने कारवर जोरात हल्ला केला.
हेल्मेटने कारवर हल्ला केल्यानंतर शरीफ अन्सारी आणि कॅबचालक सत्येंद्र गुप्ता यांच्या जोरदार वाद सुरू झाला. सुरूवातील दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली आणि त्यानंतर राग अनावर न झाल्याने हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यावेळी शरीफवर सत्येंद्र गुप्ताने आणि प्रवासी सुनील पालने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात शरीफ अन्सारी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर स्थानिकांनी त्याला तातडीनं जवळच्या रूग्णलयात दाखल केलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलीस तपासात आरोपीबाबत समजली धक्कादायक गोष्ट
या घटनेची माहिती मिळताच बांगुरनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात केली होती. तर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपी सत्येंद्र गुप्ता आणि सुनील पालला अटक केली. तसेच पोलिसांच्या तपासात सत्येंद्र गुप्ता हा मनसेचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. तो कॅबचालक म्हणून काम करत होता. तर आता आरोपी सत्येंद्र गुप्ताकडे धारदार शस्त्र कुठून आले? तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, शरीफ अन्सारी याची भरदिवसा भररस्त्यात हत्या करण्यात आल्यामुळे बांगुरनगर परिसरात खळबळ उडाली असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












