Farmer’s Loan Waiver Scheme | राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा – NEET UG 2026: नीट यूजी फॉर्ममध्ये चूक झाली? ‘या’ सोप्या स्टेप्सने आजपासून करा अर्ज दुरुस्ती
राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज दोन लाखांच्यावर आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही नोंदणी करणे आवश्यक आहे.
कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार
कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांना ‘अॅग्रीस्टॅक’ अॅप (Agristack App) हे फोनमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. नंतर या अॅपमध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे नाव, शेतजमीन आणि त्याचे प्रकार अशी माहिती द्यावी लागणार आहे.
‘अॅग्रीस्टॅक’ अॅपवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अद्याप या अॅपमध्ये नोंदणी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांना कर्जमाफीसाठी या अॅपमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ अॅपवरील नोंदणीसाठी शिबिर घेण्यात येत आहेत. तर जे शेतकरी या अॅपमध्ये नोंदणी करणार नाहीत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीये.
दरम्यान, 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत (Farmer Loan Waiver) मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जमाफीबाबत घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रूपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखापर्यंत थकीत आहे त्यांना कर्जमाफी मिळणार आहे.
तसेच आणखी एक घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात किंवा करतील अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. तर बँकिंग यंत्रणा सक्षम रहावी यासाठी समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात येईल आणि ही योजना दीर्घकालीन करण्यात येणार आहे. समितीच्या निकषानुसार कर्जमाफी करण्यासाठी दीर्घकालीन योजना केल्या जातील, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.












