Compensation for damage to grapes : द्राक्ष बागायतदारांची पंढरी म्हणुन नाशिक जि ओळख सर्वत्र आहे. मात्र यंदाच्या हंगामात मे ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी व दीर्घकाळ सुरु असलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे बागायतदार शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. नेमकं द्राक्ष बागायतदारांना काय फटका बसलाय, याची माहिती खुद्द शेतकऱ्यांनी माध्यमांना दिलीय.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे मुंबई महापालिका आयुक्तांना एक पत्र अन् बिल्डरांचे धाबे दणाणले
सध्या निसर्गाचा काहीच भरवसा राहिलेला नाही. कधी ही पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी हवादिलं झालायं त्यातच यंदा पावसाळा दिर्घकाळ चालल्याने द्राक्ष उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांची घट झाली असून सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांची गर्भधारणा न झाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. परिणामी, उत्पादन केवळ २० ते ३० टक्क्यांवर आले आहे. यामुळे बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडलंय.
दरवर्षी निसर्गातील बदलांचा परिणाम द्राक्ष बागांवर होत असतो; मात्र यंदाचा फटका अधिक तीव्र असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाढीच्या महत्त्वाच्या काळात झालेल्या पावसामुळे रोगराई वाढली, फुलधारणा कमी झाली आणि फळांची गुणवत्ता घसरली. त्यामुळे बाजारपेठेतही योग्य दर मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. उत्पादन घटल्याने द्राक्ष बागा जगवण्यासाठी केलेला खर्चही निघणार नसल्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. खत, औषधे, मजुरी, पाणी व्यवस्थापन आणि देखभालीसाठी मोठा खर्च झाला असून उत्पन्न कमी झाल्याने तो भरून निघणे कठीण झाले आहे.
एकंदरीत बेभरोशाच्या पावसामुळे कौटुंबिक खर्च, मुलांचे शिक्षण, तसेच घेतलेली कर्जे फेडायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर असल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ‘मायबाप सरकारने’ या संकटातून सावरण्यासाठी कर्जमाफी, आर्थिक मदत व विशेष पॅकेज जाहीर करावे, तसेच कृषी विभागाने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.












