राज्यात विविध मराठवाड्यासह इतर अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला बसून आता या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला उपाययोजनांची पंचसूत्री सुचविली आहे. याविषयी सांगताना शरद पवार म्हणाले,”आपत्ती निवारणाची कामे तातडीने हाती घेतानाच नुकसानभरपाईसोबतच पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा, तसेच पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन हटवावे, याशिवाय शेतकरी हिताचे निर्णय घेतानाच मानसिक व सामाजिक आधारासाठी समुपदेशन शिबिरे आणि साहित्य वाटपाचे कार्यक्रम हाती घ्यावे,” असे आवाहन शरद पवार यांनी राज्य सरकारला केले आहे.
विशेष अधिवेशन बोलवा -जयंत पाटील
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नैसर्गिक संकट उभं राहील आहे. त्यावर विरोधकांकडून सरकारला आणेल उपदेश केले जात. आहेत. यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारला तीन दिवसाचं अधिवेशन बोलवण्याची विनंती केली आहे. याविषयी,”राज्यभरात पावसाने कहर केला असून शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी विशेष राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन भरवावे,” अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पाठवून केली आहे. या पत्रात,’शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसानभरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा व्हावी आणि भरीव मदतीचा निर्णय व्हावा’, यासाठी विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, असे जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सरकारला सुचवली पंचसूत्री
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या संकटाचा सामना करण्यासाठी शरद पवार यांनी रविवारी समाजमाध्यमांवर विस्तृत पोस्ट करत पंचसूत्री सुचविली. यावेळी, आपत्तीच्या या काळात पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे, अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छपरांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तूंची पडझड होते, पाणी ओसरल्यानंतर पिके व पशुधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते, नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. यासोबतच, आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई देतानाच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याची सूचना देखील शरद पवार यांनी सरकारला केली. याशिवाय, पिकांची पुन:पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत, फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मदत करावी. तसेच पुराने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले असून या वस्तूंचाही पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात. तसेच पीकविमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत. आणि खासगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी करत शरद पवार यांनी ही पंचसूत्री मांडली आहे.