Supriya Sule | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये भारतालाही मोठा धक्का बसला असून गॅस तुटवडा (Gas Shortage) निर्माण झाला आहे. देशात गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून पीएनजीच्या विस्ताराला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एलपीजी गॅस बुकिंग प्रक्रियेत देखील सरकारने बदल केला आहे. सरकार गॅस तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन नियम काढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा – इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई पोहोचले रशियात; पुतीन यांनी विशेष विमान पाठवत दिला मदतीचा हात?
सुप्रिया सुळेंनी सरकारवर काय केली टीका?
सुप्रिया सुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात गॅसचा तुटवडा आहे हे मान्य केलं पाहिजे. पण सरकार ही गोष्ट मान्य का करत नाही? जनतेला खरं का सांगत नाही? ही राजकारण करण्याची वेळ, आरोप करण्याची वेळ नाहीये. गॅस तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे आणि यावर सर्वांनी मिळून मार्ग काढला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, जर देशात गॅस तुटवडा आहे तर त्याचा कृती आराखडा का आखला जात नाही? देशात एलपीजी गॅसची सर्व यंत्रणा कोसळली आहे. पुणे, बारामती, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव अशा अनेक ठिकाणी गॅस तुटवड्याची स्थिती आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशाची वाट पाहत आहे? आत्ता ही वेळ विरोध करण्याची नसून एकत्र येऊन गॅसच्या समस्येवर मार्ग काढण्याची वेळ आहे. मी आत्ता कोणावर आरोप करत नाही पण सर्व पक्षांना सरकारने एकत्र आणलं पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे.
सुप्रिया सुळेंनी राहुल गांधींबाबत केलं मोठं वक्तव्य
मी गॅस तुटवड्याबाबत बारामतीत जाऊन आढावा घेतला. शनिवारी-रविवारी पुण्यात गेले तर तिथेही प्रचंड अडचणी आहेत. हिंजवडीमध्ये आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांना धायरीत एक ग्रुप आहे जो पोळ्या पाठवत असतो. पण आता गॅस टंचाईमुळे त्यांचे 50 टक्के काम बंद झाले आहे. बारामतीमध्ये देखील गॅस तुटवड्यामुळे व्यावसायिकांना हॉटेल, लघुउद्योग बंद करायची वेळ आली आहे. तसेच इंदापूर, दौंड या भागातही गॅस टंचाईमुळे मोठ्या संख्येत कामगार कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.
सध्या अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती देशात आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, लघुउद्योग बंद पडले आहेत. कष्टकरी महिलांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नाहीये. ज्या महिला लघुउद्योग, खानावळी असे घरातून व्यवसाय करतात त्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. राहुल गांधींनी गॅस तुटवड्याबाबत जे मुद्दे मांडले होते ते आता खरे होताना दिसत आहेत. जर देशात खरच कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागू, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.












