गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी पाणीच पाणी तर काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गाने उचलून धरली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश सर्वत्र दिसत असून काही दिवसापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. याप्रकरणी आज झालेल्या मंत्रिमंडळात सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
काही महिन्यांपासून सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले याबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अतिवृष्टीने जवळपास ६० लाख हेक्टरचे क्षेत्र नुकसान झाले असून पहिल्या टप्प्यात जे काही नुकसान झाले होते त्यासाठी राज्यसरकारकडून 2215 कोटी रुपये वितरित करण्यात येत आहे. तसेच ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरवर्षी ओला दुष्काळाची मागणी करण्यात येते. परंतु मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपायोजना केल्या जातात आणि ज्या सवलती दिल्या जातात, त्या सगळ्या सवलती आता याही वेळी लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.











