Jai Ram Jai Bill passed Lok Sabha : मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) ची जागा घेणारे ‘जी राम जी’ विधेयक आज लोकसभेत मोठ्या गदारोळात मंजूर करण्यात आले. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवू इच्छिणाऱ्या विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी विरोध सुरू केला आणि विधेयकावर सविस्तर चर्चा झाली आहे असं सभापतींनी सांगितल्यानंतर विधेयकाच्या प्रती फाडल्या. हे विधेयक आता राज्यसभेत सादर केलं जाईल. यावर सभापती ओम बिर्ला संतापले आणि म्हणाले, “जनतेनं तुम्हाला कागदपत्रे फाडण्यासाठी आणि फेकण्यासाठी संसदेत पाठवलेलं नाही.”
हे ही वाचा : फडणवीसांची मोठी खेळी, थेट राज्यपालांकडे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी
विरोधी पक्षाचा निषेध, शिवराज सिंह चौहान यांची प्रतिक्रिया :
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा, द्रमुकचे टीआर बालू आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक विरोधी सदस्यांनी विधेयकाला जोरदार विरोध केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटलं की महात्मा गांधींचे नाव कायद्यातून काढून टाकणं हा राष्ट्रपित्याचा अपमान आहे आणि हे विधेयक राज्यांवर अधिक भार टाकतं. त्यावर या विधेयकाच्या बाजूनं युक्तिवाद करताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “काँग्रेसनं फक्त नेहरूंच्या नावानं कायदे केले आहेत आणि आता ते एनडीए सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.” प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्याचंही त्यांनी खंडन केलं की, सरकार नावं बदलण्यात वेडं आहे. चौहान म्हणाले की, विरोधक नावं बदलण्यात वेडे आहेत, तर नरेंद्र मोदी सरकार कामावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यांनी सांगितलं की मनरेगा हे केवळ भ्रष्टाचाराचं साधन आहे आणि भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर नवीन कायदा आणण्यात आला आहे यावर त्यांनी भर दिला.
‘The Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin): VB – G RAM G Bill, 2025’ passed in Lok Sabha.
House adjourned till 1100 hours of 19th December
— ANI (@ANI) December 18, 2025
विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या, सभापती संतप्त :
विरोधक मागे हटले नाहीत आणि अनेक खासदार सभागृहाच्या मध्यभागी घुसले आणि विधेयकाविरुद्ध निषेध करु लागले. त्यापैकी काहींनी विधेयकाच्या प्रती फाडल्या. सभापती ओम बिर्ला म्हणाले, “जनतेनं तुम्हाला कागदपत्रे फाडण्यासाठी येथे पाठवलेलं नाही. संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत आहे.”












