MNS setback in Shivdi : सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महापालिका निवडणुकांसाठी उभे असलेले उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले असून 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर जास्त असताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती केली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते. परंतु मनसे गटाला मोठे नुकसान भोगावे लागले. आता आणखी एका नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे.
मनसे पक्षाचे धडाडीचे नेते संतोष धुरी यांनी देखील पक्ष सोडला असून मनसे गटाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आता शिवडीचे विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांनी देखील मनसेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. संतोष नलावडे याना मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार बाळा नांदगावकर यांचा उजवा हात मानला जात होता. त्यांनी मनसे हा पक्ष सोडल्यामुळे नांदगावकर यांच्यासाठी हा मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा :काँग्रेस मुक्त भारत करणारी भाजपा काँग्रेस युक्त झाली? विरोधकांचा खोटक सवाल
आम्हाला जागा मिळाल्या नाही
माझ्या नेत्यांनी, ज्यांच्यासाठी आम्ही आयुष्य पणाला लावले, त्यांनीच या जागावाटपात पूर्णपणे ‘हाराकीरी’ केली, आमच्या नेत्यांनीच आमचा राजकीय बळी दिला असा आरोप संतोष नलावडे यांनी लगावला आहे. शिवडी, माहिम, वरळी, कांजुरमार्ग, भांडुप हा मराठी माणसांचा बालेकिल्ला असून इथे मनसेचा कडवट, निर्णायक मताधार आहे. परंतु इथेच आम्हाला जागा देण्यात आल्या नाहीत. असा गंभीर आरोप संतोष नलावडे यांनी लगावला आहे.
नेत्यांनी महाराष्ट्र सैनिकांच्या हक्काचा बळी दिला
वटवृक्षाच्या सावलीत आम्ही विसावायचो, पण आज तोच वटवृक्ष पक्षातील काही नेते आपल्या स्वार्थासाठी छाटत आहेत. या वटवृक्षाला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे. अशा विषारी झाडाला ना पाने येतात, ना फुले, ना फळे; तिथे पक्षीदेखील बसत नाहीत. जर आमचा आधारच छाटला जात असेल, तर आम्ही उभं राहायचं तरी कुठे?
पत्र लिहून माफी
संतोष नलावडे यांनी पत्र लिहून शिवडीतील सहकाऱ्यांची माफी मागितली. ते म्हणाले कि, माझ्या शिवडीतील सहकाऱ्यांनो, मी तुमची माफी मागतो. तुमच्या हक्कासाठी मी प्राणापणाने लढलो, पण माझे प्रयत्न विफल झाले. म्हणूनच, आज जड अंतःकरणाने मी या प्रवासाला ‘पूर्णविराम’ देत आहे. आज मी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत असलो, तरी गेल्या २० वर्षांची ही संघर्षाची शिदोरी आणि राजसाहेबांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहतील. याची मला खात्री आहे.
पक्षाने माझ्यावर हे असं पत्र लिहायची वेळ आणली
आज हे पत्र लिहिताना मनात असंख्य वादळे घोंघावत आहेत. विचारांचे वादळ आले आहे. गेले… अनेक दिवस मी अस्वस्थ आहे. ज्या भावनेने मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा सदस्य झालो. पुढे झपाटून काम केले. त्याच पक्षाने माझ्यावर हे असं पत्र मला लिहायची वेळ आणली आहे. हे मलाच भयानक स्वप्नासारखे वाटते आहे. शाळेत असल्यापासून रक्तात सळसळणारा ‘शिवसैनिक’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राजसाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलेला हा तुमचा ‘भाऊ’, आज आयुष्याच्या एका अत्यंत कठीण वळणावर उभा आहे.
राजसाहेबांवर राग नाही
माझा राग आदरणीय राजसाहेब, अमित साहेब किंवा शर्मिला वहिनी यांच्यावर मुळीच नाही. त्यांनी आम्हाला नेहमीच प्रेम आणि आदर दिला. पण जिथे नेत्यांच्या कचखाऊ, कुटील धोरणांमुळे कार्यकर्त्यांना ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी वागणूक मिळते, तिथे राहण्यात काय अर्थ? कुठे थांबायचे, हे ज्याला कळते तोच पुढे जातो. मला चक्रव्यूहात अडकलेला ‘अभिमन्यू’ व्हायचे नाही, तर तो चक्रव्यूह भेदणारा योद्धा व्हायचे आहे.












